Saturday , October 19 2024
Breaking News

राष्ट्रीय स्तरावर धर्मांतर रोखण्यासाठी कायद्यासह घटना दुरुस्तीची आवश्यकता!

Spread the love

पणजी : आज देशामध्ये दर वर्षी हिंदूंचे लाखोंच्या संख्येने धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन तथा मुसलमान बनवले जात आहे. अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा असला, तरी राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर करून भारताला तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. धर्मांतराची समस्या देशव्यापी असल्याने राज्यघटनेतील कलम 25 मध्ये सुधारणा करून त्यातील धर्माचा प्रचार करणे (Propagate Religion) हा शब्द काढला पाहिजे. त्यासोबत गोवा सरकारने विधानसभेत या संबंधीचा ठराव पारित करून केंद्र शासनाला पाठवला पाहिजे. तरच अवैध धर्मांतरणावरती संपूर्ण बंदी येईल. स्वत:च्या धर्माचे पालन करण्याला कोणतीही आडकाठी आणण्याची आवश्यकता नाही; मात्र इतरांना फसवून, जबरदस्ती करून किंवा त्यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन केल्या जाणार्या धर्मांतरावर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी सीबीआयचे माजी हंगामी संचालक श्री. एम. नागेश्वर राव यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या तृतीय दिनी फोंडा, गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थाना’तील विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी व्यासपीठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, ख्रिस्ती पंथ सोडून हिंदु झालेल्या तेलंगणा येथील श्रीमती एस्थर धनराज, छत्तीसगड येथे लाखो हिंदूंची घरवापसी करणारे भाजपचे प्रदेशमंत्री श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव आणि नेपाळ येथील विश्व हिंदु महासंघचे जिल्हाध्यक्ष श्री. शंकर खरेल उपस्थित होते.
यावेळी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले की, धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंमध्ये धर्मजागृती करून त्यांना धर्मशिक्षण दिले पाहिजे. धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण प्रारंभ केल्यास कोणीही धर्मांतर करू शकणार नाही. गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनी धर्मांतर बंदी कायदा करण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. तसेच गोव्यात डॉमनीक आणि अन्य ख्रिस्ती प्रचारकांकडून जे धर्मांतर चालू आहे, ते रोखण्यासाठी गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यासह संविधानात पालट करायला हवा. छत्तीसगड येथील भाजपचे प्रदेशमंत्री श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव म्हणाले की, हिंदूंच्या धर्मांतर करणार्या विदेश शक्तींकडे प्रचंड पैसा आणि साधने आहेत. माझ्या वडीलांनी लाखो हिंदूंची, तर मी 15 हजार हिंदूंची घरवापसी केली आहे; मात्र हे करतांना आमच्यावर जीवघेणी आक्रमणे मिशनरी, नक्षलवादी यांच्याकडून झालेली आहेत. धर्मांतर रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये धर्म समिती स्थापन करून धर्मसेना उभी केली पाहिजे. त्याने चांगला लाभ झालेला आहे. नेपाळ येथील श्री. शंकर खरेल म्हणाले की, नेपाळमध्ये 3 कोटी लोकसंख्येच्या देशात 30 लाख लोक धर्मांतरीत झाले आहेत. ही चिंतेची बाब आहे. हे धर्मांतर रोखण्यासाठी गरीबी, शिक्षण आणि अन्य मूलभूत गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे. तेलंगणा येथील एस्थर धनराज म्हणाल्या की, मी स्वत: ख्रिश्चन होते; मात्र अमेरिकेत गेल्यावर बायबलचा अभ्यास केल्यावर त्यात तर्कशास्त्र नसल्याचे लक्षात आले. पुढे भारतात आल्यावर मिशनरी लोकांकडून धर्मांतरासाठी चाललेली षड्यंत्रे पाहून त्याविरोधात जागृती चालू आहे. तसेच धर्मांतरीत हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मांत आणण्याचे आणि युवकांना समुपदेशन करण्याचे काम करत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ मुळवी आणि मानसी जामसंडेकर यांना ‘अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार’

Spread the love  मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने “माय मराठी: अभिजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *