नवी दिल्ली : आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात संयुक्तपणे एक उमेदवार देण्याविषयी विरोधी पक्षांच्या बैठकीत एकमत झाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी पूर्ण होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांनी संयुक्तपणे एक उमेदवार उभा करण्यासाठी प. बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे बैठक बोलावली होती.
बैठकीमध्ये विरोधी पक्षांचा एक संयुक्त उमेदवार देण्याविषयी एकमत झाल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. अनेक महिन्यांनंतर अशाप्रकारे बैठकीत राजकीय पक्ष एकत्र आले असून आता उमेदवार निश्चितीसाठी पुन्हा भेटणार असल्याचे त्या म्हणाल्या. बैठकीमध्ये घटनेचे रक्षण करणारा आणि मोदी सरकारद्वारे लोकशाही आणि समाज जीवनास होणारे नुकसान थांबविणारा उमेदवार देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे सुधींद्र कुलकर्णी यांनी बैठकीनंतर सांगितले.
राजनाथ सिंह यांची बॅनर्जी, मल्लिकार्जुन खर्गेंसोबत चर्चा
राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच बुधवारी राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत मल्लिकार्जुन यांनी भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या नावावर चर्चा करु, असे राजनाथ यांना सांगितल्याचे कळतेय. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी ममता आणि मल्लिकार्जुन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबतही फोनवर बातचित केली.
महात्मा गांधींचे नातू विरोधकांचे उमेदवार?
राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीत डाव्या संघटनांकडून महात्मा गांधी यांचे नातू तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्या नावासंबंधी चर्चा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. माकपा नेते सीताराम येचुरी यांनी एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्यासोबत घेतलेल्या भेटीदरम्यान हे नाव सुचवल्याची माहिती समोर आली आहे. पवारांना देखील या नावावर आक्षेप नसल्याचे कळतेय. दरम्यान, गोपाळकृष्ण गांधी यांनी यासंबंधी विचार करण्यास वेळ मागितला आहे. विरोधकांच्या बैठकीत देखील त्यांच्या नावावर चर्चा करण्यात आल्याचे कळतेय.
बैठकीला या नेत्यांची हजेरी
ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, शिवसेनाकडून प्रियंका चतुर्वेदी, डाव्या पक्षाचे दीपांकर भट्टाचार्य, आरजेडीचे मनोज झा, पीडीपीकडून महबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, काँग्रेसकडून रणदीप सुरजेवाला, मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश, सपाकडून अखिलेश यादव, आरएलडीचे जयंत चौधरी आणि डीएमकेचे टी आर बालू उपस्थित होते.
यांची बैठकीला दांडी
के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष, अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी, बसपा, वाईएसआर काँग्रेस, बीजेडी आणि अकाली दलकडून या बैठकीला कोणीही आले नाही. या पक्षांनी विरोधकांच्या बैठकीला दांडी मारली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुजन समाज पार्टी (बीएसपी) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) यासारख्या काही पक्षांना या बैठकीचे आमंत्रण नव्हते. आमंत्रण असताना न आलेल्या पक्षाममध्ये टीआरएस, बीजेडी, आम आदमी पार्टी आणि अकाली दल यांचा समावेश आहे.
Check Also
दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू
Spread the love चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …