Thursday , September 19 2024
Breaking News

अग्निपथच्या विरोधाचं लोण दक्षिणेत, सिकंदराबादमध्ये रेल्वे पेटवली, गोळीबारात एकाचा मृत्यू

Spread the love

सिकंदराबाद : केंद्र सरकारनं सैन्य दलातील भरतीसाठी सुरु केलेल्या अग्निपथ योजनेला उत्तर भारतातील राज्यातील युवकांनी विरोध केला. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सुरु झालेल्या आंदोलनाचं लोण दक्षिण भारतात पोहोचलं आहे. तेलंगाणामध्ये सिकंदराबादमध्ये रेल्वे स्टेशनवर हिंसक आंदोलन केलं आहे. आज सिकंदराबादमध्ये शेकडो तरुणांनी एकत्र येत रेल्वे गाड्यांचं आणि स्टेशनवरील दुकानांचं नुकसान केलं. सिकंदराबादमध्ये सकाळी झालेल्या आंदोलनात 13 जण जखमी झाल्याची माहिती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सिकंदराबादमधील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं सीआरपीएफच्या तीन तुकड्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार सिकंदराबादमध्ये युवकांनी सकाळी उभ्या असलेल्या रेल्वेला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. युवकांच्या आक्रमक आंदोलनानंतर सिकंदराबादमधील रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे. आंदोलकांनी रेल्वे स्टेशनवरील कार्यालयांचं देखील नुकसान केलं आहे.
रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदराबादमधील रेल्वेसेवा आणि टीएसआटीसीच्या सेवेवर देखील परिणाम झाला आहे. अग्निपथ योजनेला उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेशमध्ये विरोधाला सुरुवात झाली होती. तरुणांनी केंद्र सरकारनं अग्निपथ योजना मागं घ्यावी अशी मागणी केली आहे.
सिकंदराबादमध्ये अग्निपथ योजनेला विरोध करताना तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिसाकंडून 17 राऊंड फायर करण्यात आली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, 13 जण जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 2 जण गंभीर जखमी आहेत. सिकंदराबादमधील घटनेनंतर तेलंगाणामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
केंद्र सरकारनं मंगळवारी अग्निपथ अंतर्गत अग्निवीर योजना जाहीर केली. या योजनेनुसार इंडियन आर्मीमध्ये तरुणांना 4 वर्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. अग्निपथ योजनेनुसार दरवर्षी 46 हजार युवकांची निवड केली जाईल. चार वर्ष संपताना त्यापैकी 25 टक्के युवकांना सैन्यदलात नोकरी मिळेल. इतर युवकांना चार वर्षांचा कालावधी संपताना जवळपास 11 लाख रुपयांची रक्कम हातात मिळेल, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *