जागतिक भूक निर्देशांकात घसरण!
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय चलनाची घसरण बाजारात चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कमी पडझड झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतंच नमूद केलं. मात्र, जागतिक भूक निर्देशांकात मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घरसरण झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index यादीमध्ये भारताची 101व्या क्रमांकावरून 107व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आणि भारताचा छोटा भाऊ मानला जाणारा नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं आहे.
2021मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या यादीत भारत 101व्या स्थानावर होता. हे स्थानदेखील भारतातील भूकेसंदर्भातली गंभीर परिस्थिती विशद करण्यासाठी पुरेसं होतं. मात्र, यावर्षीच्या आकडेवारीनुसार त्यामध्ये आणखीन सहा अंकांची घसरण झाली आहे. 121 देशांमध्ये आता भारत 107व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी नेपाळ (81), पाकिस्तान (99), श्रीलंका (64) आणि बांगलादेश (84) या शेजारी देशांची क्रमवारी लागते.
कन्सर्न वर्ल्डवाईड’ आणि ‘वेल्थ हंगर लाईफ’ या संस्थांकडून संयुक्तपणे दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते. संबंधित देशामध्ये उपाशीपोटी राहणार्या लोकांच्या आकडेवारीवरून भूकेची तीव्रता किती आहे, या निकषावर त्या त्या देशांचं मूल्यांकन केलं जातं. त्यानुसार रँकिंग करण्यात येतं. भारताला या निकषांवर 29.1 इतकं रँकिंग मिळाल्यामुळे भारताची यादीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 9.9 पेक्षा कमी गुण असल्यास त्या देशातील परिस्थिती चांगली मानली जाते. हे रँकिंग 10 ते 19.9 पर्यंत असल्यास परिस्थिती बरी मानली जाते. 20 ते 34.9 या दरम्यान रँकिंग असल्यास गंभीर, 35 ते 49.9 दरम्यान असल्यास चिंताजनक आणि 50च्यावर रँकिंग असल्यास परिस्थिती भीषण असल्याचं मानलं जातं.
Belgaum Varta Belgaum Varta