श्रीहरिकोटा : भारताचे चांद्रयान लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं असून त्यासाठी वातावरण पोषक असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. चांद्रयान आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार असून अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश असणार आहे.
भारताचं महत्वाकांक्षी चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालंय. चांद्रयान-3 लॅण्ड व्हायला अवघे दोन तास उरलेत आणि भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याकडे लागलंय. आज सायंकाळची सहा वाजून 4 मिनिटांची वेळ भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. कारण हीच ती वेळ आहे जेव्हा चांद्रयान-3 चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे.
भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-3 मोहीम आता अखेरच्या टप्प्यात आहे. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल संध्याकाळपासून सुरू झालंय. लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झालीय. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर सूर्योदयाला सुरुवात होईल आणि चांद्रयानाचं सॉफ्ट लॅण्डिंग होईल. 2019 मधील चांद्रयान-2चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोनं चांद्रयान-3 साठी संपूर्ण काळजी घेतलीय. विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळतील.