नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून मान्सून कधीपासून सुरू होईल याची वाट राज्यातील शेतकरी करत होते. गेल्या वर्षी मान्सून उशीरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले होते. यामुळे यावर्षीही पाऊस वेळेत सुरू होईल की नाही यावरुन शेतकरी चिंतेत होते. देशातील तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. काल दिल्लीत तापमानाने रोकॉर्ड केले. दरम्यान, आज हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.
मान्सून उत्तर-पूर्व भारत आणि केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील दहा दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हावामान विभागाने सांगितले आहे. नैऋत्य मोसमी पावसाने आज ३० मे २०२४ रोजी केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश केला आहे. आज कोकणात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.
प्रत्येकवर्षी मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होतो, या वर्षी मान्सून ३१ मे रोजी केरळात येईल असा अंदाज हवामान विभागाने दिला होता पण, एक दिवस आधीच म्हणजे ३० मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला असून पुढच्या प्रवासात गती असल्याचेही दिसत आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी?
आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केरळात मान्सून आज दाखल झाला आहे. आता मान्सूनच्या पुढच्या प्रवासातही प्रगती आहे. पुढच्या दहा दिवस म्हणजेच १० जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.