सुमारे ९० लाखांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग : शेतकरी हतबल
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील मळी भागातील सुमारे २५ एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचे शेतकरी वर्गातून बोलले आहे. या आगीमुळे सुमारे ९० लाखांचे नुकसान झाले आहे.
माणकापूर येथील शेतीसाठी सकाळी १० ते २ अशी लाईट होती. सकाळी १० वाजता लाईट आल्यानंतर शॉर्टसर्किट झाल्याने ऊसाच्या फडाला आग लागली. बघता बघता काही मिनिटांमध्येच आग सर्वत्र पसरली. शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण सर्वांचा नाईलाज झाला. त्यानंतर अग्निशामक दलाला दूरध्वनी वरून या घटनेची माहिती देण्यात आली.
घटनास्थळी सदलगा येथील अग्निशमन दल दाखल झाल्यानंतर काही आग नियंत्रणात आली. आगीत संजय माळी यांचा २ एकर, विजय माळी ७ एकर, जयपाल चौगुले ३ एकर, दादासो निनुरे २० गुंठे, रामा कोळी व बंधू १ एकर, आण्णासो चौगुले व बंधू २ एकर, जयपाल वलशेट्टी १ एकर २० गुंठे, लोहार, लोंढे, कासार, कोळी आदी शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. त्यासोबत कुपनलिका, चेंबर, ठिबकच्या पाईप, पेटी असे इतर साहित्यदेखील जळाले.
ग्राम पंचायत उपाध्यक्ष युनूस मुल्ला, सदस्य जयपाल चौगुले, नाना माळी, अमोल करवते, किरण चौगुले, अभय वरुटे, दादासो निंगनूरे, तात्यासो निंगनूरे, बबन जामदार यांच्यासह शेकडो शेतकरी व ग्रामस्थांनी आग नियंत्रणासाठी प्रयत्न केले.
—-
चूक हेस्कॉमची, नुकसान शेतकऱ्यांचे
दरवर्षी ऊसाचा गळीत हंगाम सुरू होताच आणि एक शेतकऱ्यांच्या उसाला शेतातून गेलेल्या वीज वाहिल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असूनही भरपाई मात्र दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात असून चूक हेस्कॉमची नुकसान मात्र शेतकऱ्यांचे अशी चित्र ऊसाच्या बाबतीत घडत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta