कोगनोळी : हणबरवाडी तालुका निपाणी येथे गेल्या चार-पाच दिवसापासून पिण्याचे पाणी आले नसल्याने येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांना सुरळीत पाणी देण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना विजय खोत म्हणाले, हणबरवाडी येथील ग्रामस्थांना गेल्या चार दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात ग्रामपंचायतच्या सदस्यांना व ग्राम विकास अधिकार्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी यांनी दिलेली उत्तरे अतिशय चुकीची असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज आहे. यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी ताबडतोब न मिळाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव म्हणाले, काही कारणाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला नाही. ताबडतोब पाणी सोडणार्या कर्मचार्याला बोलवून घेऊन पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आक्रमक झालेल्या हणबरवाडी ग्रामस्थांनी ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत उपाध्यक्ष व कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरले.
यावेळी युवराज खोत, पोपट खोत, शिवाजी शिंदे, कृष्णात खोत, सचिन खोत, अनिकेत खोत, अजित खोत, आनंदा खोत यांच्यासह अन्य ग्रामस्थ, युवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta