धजद उमेदवार राजू पोवार : सुळगाव, मतीवडे, आप्पाचीवाडी प्रचार दौरा
निपाणी (वार्ता) : गेल्या १५ वर्षापासून निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील विखुरलेल्या शेतकऱ्यांचे संघटन करून न्याय देण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उसासह इतर भाजीपाला पिकाला हमीभाव मिळावा यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विधानसभेला सुध्दा घेराव घातला आहे. ऐन दिवाळीच्या काळात त्यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलीस कोठडीत जावे लागले. येत्या काळात शेतकऱ्यांची सेवा अधिक प्रमाणात करता यावी, या उद्देशानेच धजदचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आपणाला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार पोवार यांनी केले.
गुरुवारी सुळगाव, मतीवडे आणि आप्पाचीवाडी परिसरात प्रचार दौरा काढून मतदार आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
त्यांच्याशी केलेली ही बातचीत..
राजू पोवार म्हणाले, प्रत्येक गावातील शेतकरी संघटित नसल्याने दहा वर्षापासूनच आपण शेतकऱ्यांचे संघटन करून रयत संघटनेच्या नावाखाली कामकाजाला सुरुवात केली. प्रत्येक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ऊसाला चांगला दर, एफ आर पी वाढवून मिळावी. प्रत्येक ऊस उत्पादक सभासदाला १०० किलो साखर मिळावी, १५ दिवसात शेतकऱ्यांची ऊस बिल मिळावेत, यासह विविध आंदोलने छेडून शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. याशिवाय अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या पिकाला भरपाई मिळवून दिली आहे. तर पडदा झालेल्या घरांनाही मदत मिळावी, यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर संघटनेतर्फे आंदोलन करून न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे भविष्यात शेतकरी व नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यासाठी कुमार स्वामी मुख्यमंत्री होणार आहेत. त्यासाठी त्यांच्या हात बळकट करण्यासाठी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी संजय पोवार, नवनाथ पोवार, सदाशिव पोवार, चेतन पाटील, अनिल सुतार, आनंदा पोवार, महादेव शेळके, विकास पाटील, लखन कांबळे, सुनील कांबळे, प्रकाश वाळके, सदाशिव पाटील,रावसाहेब पाटील, प्रवीण जाधव, नानासाहेब कांबळे, गणेश कांबळे, यशवंत कांबळे, सातापा कांबळे यांच्यासह कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
—
Belgaum Varta Belgaum Varta