Wednesday , December 10 2025
Breaking News

न्यायालय मराठी भाषिकांना योग्य न्याय देईल

Spread the love

 

निपाणीत मराठी भाषिकांची मागणी : काळा दिन बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

निपाणी (वार्ता) : सर्वोच्च न्यायालयाबाबत प्रत्येकाच्या मनात आदराची भावना आहे. न्यायालय मराठी भाषिकांना योग्य न्याय देईल, असा विश्वास आहे. मात्र सीमाप्रश्नाच्या सुनावणीवरून गेल्या काही वर्षात जी चालढकल सुरू आहे ती थांबणे आवश्यक आहे. मराठी भाषिक जनता कानडी प्रशासनाच्या वरवंट्यात भरडली जात असून लवकरात लवकर मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी मागणी मराठी भाषिकांनी केली.
बुधवारी काळा दिनप्रश्नी पुकारण्यात आलेल्या निपाणी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी बारा वाजेपर्यंत बहुतांशी शहर व उपनगरातील व्यवहार बंद होते. यानंतर येथील बस स्थानकानजिकच्या गुरुकृपा मंगल कार्यालयात मराठी भाषिकांची सभा झाली.

यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे जयराम मिरजकर म्हणाले, 1956 पासून आजचागायत मराठी भाषिकांनी ज्वलंत इतिहास निर्माण केला आहे. एक नोव्हेंबरच्या काळा दिनाला अनेक संकटे येऊनही हा दिन कडकडीतपणे मराठी भाषिक पाळतात. आम्ही मूळचे महाराष्ट्राचे असून सीमाप्रश्नासाठी अनेकांनी प्राण्याची आहुती दिली. साराबंदीसारख्या चळवळी केल्या. त्यामुळे लवकरात लवकर मराठी भाषिकांना आता न्याय मिळावा अशी मागणी केली.
शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे म्हणाले, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असला तरी मराठी भाषिकांनी रस्त्यावरची लढाई लढणे आवश्यक आहे. यासाठी या चळवळीत युवा पिढीने सक्रिय सहभाग वाढवावा. कर्नाटक सरकारला मान्य असलेल्या महाजन अहवालानुसार निपाणी महाराष्ट्रात असून या ठिकाणी प्रशासनाने चालवलेले दबावतंत्र चुकीचे असल्याचे सांगितले. प्रा. भारत पाटील यांनी, राज्यांच्या सीमाप्रश्नांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे प्रयत्न करत असून लवकरच सीमाभागातील मराठी भाषिकांनाही न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष बंडा पाटील म्हणाले, तिसरी पिढी संपत आली तरी सीमाप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत येथील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन युवा समितीच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 15 उमेदवारांना महाराष्ट्राची शासकीय नोकरी मिळवून देण्यात आली आहे. सीमाप्रश्न तसेच येथील युवकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्र्यांना भेटून निवेदने दिली असल्याचे सांगितले. लक्ष्मीकांत पाटील यांनी या लढ्यात मराठी भाषिकांची पिढीच्या पिढी भरडली जात असून पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करून लवकरात लवकर मराठी भाषिकांना पारतंत्र्यातून मुक्त करावे, अशी मागणी केली.
यावेळी उदय शिंदे, अजित पाटील, नेताजी पाटील, हिंदुराव मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशांत नाईक, रमेश निकम, शरद माळगे, नवनाथ चव्हाण, नंदकिशोर कांबळे, गणेश माळी, अशोक खांडेकर, आशिष मिरजकर यांच्यासह मराठी भाषिक कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *