प्रा. डॉ. अमोल नारे; देवचंद महाविद्यालयाचे शिबिर
निपाणी (वार्ता) : आधुनिक काळात बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्य जपणे काळाची गरज बनली आहे. भौतिक सुविधा असतानाही मानसिक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. अनेक विद्यार्थीही मानसिक दृष्ट्या निरोगी आहेत. किरकोळ कारणावरून टोकाचे निर्णय घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे, असे मत अर्जुनी येथे राष्ट्रीय सेवा योजना (कनिष्ठ विभाग) यांच्यामार्फत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात बोलताना प्रा. डॉ. अमोल नारे यांनी व्यक्त केले.
डॉ. नारे म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविध खेळ, विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासह निसर्ग प्रवास करणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थी ताण-तणावापासून दूर राहतील. सोशल मीडियाचा वापर वाढल्याने विद्यार्थी वास्तविक जीवनापासून दूर जाऊन आभासी जीवन जगत आहेत.त्यामुळे विद्यार्थी भविष्यामध्ये मानसिक समस्यांचे शिकार बनतात. विद्यार्थ्यांनी निकोप राहण्यासाठी सुंदर जीवनशैली आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. नारे यांनी विद्यार्थ्यांच्याकडून ऍक्टिव्हिटी मोटिवेशन टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्न ओळखून त्याच्यावर चर्चा केली. प्रा. डॉ. आर यु. घटेकरी यांनी स्वागत केले. प्रा. व्ही. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास स्वयंसेवक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. सुमित कल्याणकर यांनी आभार मानले.