मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल निपाणीत आनंदोत्सव
निपाणी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने निपाणीतील मराठी भाषिकांच्या बैठकीत केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला.
अनेक वर्षापासून मराठी प्रेमी भाषिकांची मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी होती. या मागणीला यश आल्याने निपाणीतील मराठी भाषिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अच्युत माने म्हणाले, मराठी भाषा ही देश विदेशातील अभ्यासकांची अभ्यासाची व संशोधनाची भाषा आहे. ज्ञानेश्वरापासून मराठीचा गौरव होत आलेला आहे. संत तुकारामांच्या अभंगाला तर जागतिक साहित्याचा दर्जा आहे. मराठी भाषेमुळे साहित्य आणि मराठी संस्कृती संपन्न झालेली आहे. आज पर्यंत मराठीतील चार साहित्यिकांना ज्ञानपीठ साहित्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. अभिजात दर्जामुळे साहित्यिकांचा आणि भाषा प्रेमींचा भाषिक अध्यापन आणि संशोधनाकडे कल वाढणार असून साहित्य संस्थांना प्रोत्साहन मिळणार आहे.
या निर्णयानंतर सीमा प्रश्नांमध्येही केंद्र शासनाने लक्ष घालून लाखो मराठी भाषिकांना न्याय द्यावा आणि कानडी सक्तीमधून सीमा वासीयांची मुक्तता करावी, अशी केंद्र शासनाला विनंती करणारा ठराव या वेळेला करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अच्युत माने यांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी जयराम मिरजकर, अशोक खांडेकर, उदय शिंदे, अशोकराव चाळके, बाळासाहेब हजारे, रमेश निकम, संभाजी शेलार, आनंद संकपाळ, एम. आर. ढेकळे, सुधाकर माने, नंदकुमार कांबळे, बाबासाहेब मगदूम, नितीन इंगवले आदी उपस्थित होते.