अक्कोळ ग्रामपंचायतीचा उपक्रम : सायंकाळी दोन तास अभ्यास करणार विद्यार्थी
निपाणी (वार्ता) : सध्याच्या डिजिटल व्यसनाधीनतेला आळा घालून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी निपाणी तालुक्यातील अक्कोळ गावाने एक आदर्शवत आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. गावातील सर्व घरांमध्ये दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत टीव्ही व मोबाईल वापर बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून या ‘स्क्रीन-ऑफ गाव’ उपक्रमाची सुरुवात मकर संक्रांती सणापासून करण्यात आली. या अनोख्या उपक्रमाचे सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे भोंगा वाजताच दोन तास विद्यार्थी अभ्यासाला बसणार आहेत.
भोंगा वाजताच गावकऱ्यांकडून दोन तास टीव्ही व मोबाईल बंद होणार आहेत. ‘दोन तास विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी’ या संकल्पनेतून टीव्ही आणि मोबाईलला सुट्टीचा संकल्प केला आहे.
पालकांनी दररोज मुलांचा अभ्यास घ्यावा आणि विद्यार्थ्यांना टीव्ही व मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह मानसिक आरोग्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, शिवाय सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास होत आहे. बेळगाव जिल्ह्यात ‘डिजिटल शिस्त’ रुजवणारे पहिले गाव ठरण्याचा मान अक्कोळ गावाने मिळविला आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे, उपाध्यक्षा शारदा कोळी, सदस्य युवराज पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला आहे.
————————————————————
‘विद्यार्थी आणि पालक सध्या टीव्ही आणि मोबाईलच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यापासून विद्यार्थी व पालकांना दूर ठेवण्यासाठी उपाययोजना राबविणे गरजेचे होते. त्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेऊन भोंगा वाजवून टीव्ही मोबाईल बंद करण्याचा उपक्रम राबवला आहे.’
-इंद्रजीत सोळांकुरे, अध्यक्ष, ग्रामपंचायत अक्कोळ
Belgaum Varta Belgaum Varta