निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरातील साखर कारखान्यासाठी ऊसतोड करणाऱ्या मजुरांकडून प्रतिएकर उसामागे ८ ते १० हजार रुपये सक्तीने घेतले जात आहेत. ऊस तोडणी-ओढणीची रक्कम मिळत असतानाही शेतकऱ्यांकडूनही आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची २० गुंठे ते ५ एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ऊसतोड मुजराकडून होणारी लूट थांबविण्यासाठी रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी येथील हालसिद्धनाथ साखर कारखान्यास इतर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांशी भेट दिली. शिवाय खुशाली दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कालगोंडा कोटगे, महेश जनवाडे, विशाल मिरजे, इरगोंडा चन्नबसू, प्रवीण पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
अनेक कारखान्यांवर अपेक्षित ऊसतोड कामगार नसल्याचे कारण सांगितले जात आहे. शेतकऱ्यांनी स्वतःहून ऊसतोड करावी, असे साखर कारखान्यांकडून आवाहन केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःहून ऊसतोड करण्याचे नियोजन होत नाही, त्या शेतकऱ्यांकडून कारखान्यांचे ऊसतोड मजूर प्रति एकर १० हजार रुपये रुपये घेत आहेत. पाच एकर ऊस असलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची रक्कम ऊसतोडणी करणाऱ्यांनाच द्यावे लागत आहेत. तर उर्वरित रकमेपैकी पीक कर्ज, मुलांच्या शाळांचा खर्च, सण-समारंभ याशिवाय घर खर्च चालवावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसत आहे. यावर तक्रार कोणाकडे करायची असा सवाल निपाणी तालुका रयत संघटनेचे सेक्रेटरी कालगोंडा कोटगे यांनी व्यक्त केला आहे.
बहुतांश साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची राजरोस लूट सुरू आहे. याबाबत साखर कारखान्यांकडे तक्रार केली, तरीही त्याची दखल घेतली जात नाही. तुम्ही पैसे देणार नसाल, तर आम्ही तुमचा ऊस तोडणार नाही, म्हणून शेतकऱ्यांना धमकी दिली जात आहे. यातून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांला विनाकारण त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. एकीकडे अतिवृष्टी, पुरातून वाचवलेला ऊस वेळेत तोडला जावा, यासाठी शेतकऱ्यांकडून विनंती केली जात असताना त्यांच्यावर आर्थिक लुटीचे दुसरे संकट उभे राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta