शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; मजूर टोळ्याकडून एकरी १० हजारांची मागणी; वाहन चालकाला जेवणासाठी ४०० रुपये
निपाणी (वार्ता) : साखर कारखान्यांनी तोडणीच्या दरात वाढ करूनही हार्वेस्टर चालक आणि ऊस टोळ्यांकडून शेतकऱ्यांकडे ऊस तोडणीसाठी एकरी दहा ते बारा हजार रुपये तर वाहन चालकाला जेवणासाठी ४०० रुपयांची मागणी निपाणी शहर आणि परिसरातील शेतकऱ्याकडून होत आहे. उसाच्या रानात लूटमार करणारे ‘कोल्हे’ शिरल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
हार्वेस्टर मशिनचे ऊसतोडणीपूर्वीच चालक शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करत आहेत. फडाची पाहणी करून अंतिम तडजोड केली जात आहे. त्यामुळे या यंत्रणेत बळीराजाचाच ‘बळी’ जात असून आहे मुबलक पावसाने गेल्या दोन वर्षांपासून उसाचे क्षेत्र वाढले आहे. या परिसरासह सीमा भागातील महाराष्ट्रा मधील साखर कारखान्यांना ऊस दिला जातो. ऊस वेळेत गाळपाला जाण्यासाठी नाईलाजास्तव शेतकरी जादा रक्कम देण्यास तयार होत आहेत. उसाचे क्षेत्र कमी असलेल्या फडात हार्वेस्टर चालक मशिन चालवत नाहीत. त्यामुळे मागेल ती रक्कम त्यांना द्यावी लागत आहे. सध्या एकर क्षेत्रासाठी १० ते १२ हजार रुपये घेतले जात आहेत. शिवाय वाहन चालकाला जेवणासाठी प्रति ट्रॉली ४०० रुपये द्यावे लागत आहेत.
—-
लुटमारीमुळे अल्पभूधारक शेतकरी अडचणीत
ऊस तोडणीसाठी होत असलेल्यालुटमारीमुळे काही अल्पभूधारक ऊस लागणीकडे यंदा पाठ फिरवली आहे. शिवाय असे शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत. त्यामुळे सध्यातरी ‘फड सांभाळ तुऱ्याला आला, तुझ्या उसाला लागला कोल्हा’ अशी परिस्थिती ऊस उत्पादकांवर आली आहे.
—
‘अतिवृष्टी, महापूर, ऊसाला तुरे आल्याने वजनात झालेली घट अशा विविध कारणांनी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची पिळवणूक न थांबल्यास आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.’
-अशोक क्षीरसागर, ऊस उत्पादक शेतकरी, बेनाडी
Belgaum Varta Belgaum Varta