
डॉ. बी. एस. नवी; बागेवाडी महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील परिषद
निपाणी (वार्ता) : जागतिक आर्थिक परिस्थिती, स्टार्टअप संस्कृती, संशोधनाची गरज आणि व्यवस्थापन धोरणांचे विश्लेषण महत्त्वाचे आहे. नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धत तंत्रज्ञानापुरते मर्यादित ठेवू नये. त्यामध्ये मूल्य-आधारित व्यवस्थापन, नीतिमत्ता आणि सामाजिक जबाबदारीचा समावेश असावा, असे बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. बी. एस. नवी यांनी व्यक्त केले.
केएलई संस्थेच्या येथील जी.आय. बागेवाडी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी होते.
बदलती जागतिक आर्थिक व्यवस्था, डिजिटल बाजारपेठ, ई-कॉमर्सचा विस्तार आणि माहिती तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट त्यांनी केली. एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रियंका कामत यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रम समन्वयक बी.जी. कंकणवाडी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
शिंदे यांनी बँकिंग क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित सेवांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी उद्योजकता स्वीकारण्याचा आणि नवीन संधी निर्माण करण्याचा सल्ला दिला.
विविध राज्यांतील ६० हून अधिक प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी दोन परिषदांमध्ये आपले शोधनिबंध सादर केले. निवडलेल्या आणि प्रकाशित झालेल्या ७५ शोधनिबंधांच्या २ पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
प्राचार्य डॉ. हुरळी यांनी, हे महाविद्यालय दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांना प्राधान्य देत आहे. अशा परिषदांमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढण्यास आणि संशोधन भावना विकसित होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. यावेळी पदवीपूर्व कॉलेजच्या प्राचार्या हेमा चिक्कमठ, डॉ. एस.एम. रायमाने, शंकरमूर्ती के. एन. एस. ए. देशपांडे, रेणू घुगरे, पल्लवी अनुरे यांच्यासह विभाग प्रमुख, विविध जिल्हे आणि राज्यांतील प्राध्यापक, आणि संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. नमिता नायक आणि श्रीदेवी मुंडे यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल हिरेकुडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta