
प्लास्टिक टाळा देश वाचवा : ’अंकुरम’ शाळेचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने अनेक सोयी-सुविधा घरबसल्या मिळत आहेत. त्याप्रमाणे मानवाच्या चुकीमुळे पर्यावरणाचे समतोल बिघडून प्रदूषण वाढत आहे. याशिवाय वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते अपघातही दररोज घडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन येथील श्रीनगरमधील अंकुरण इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी पर्यावरण प्रदूषण आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती व प्रबोधन करण्याचा उपक्रम येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात राबविला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संतोष सांगावकर, पर्यावरण अभियंते चंद्रकांत गुडनावर उपस्थित होते.
प्रारंभी बसस्थानकापासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत चिमुकल्यांनी हातात प्रबोधनाचे वेगवेगळे फलक घेऊन रॅली काढली. त्यानंतर प्लास्टिकमुळे होणार्या प्रदूषणाबाबत चिमुकल्यांनी छोटी नाटिका सादर केली. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नगरसेवक संतोष सांगावकर यांनी, अलीकडच्या काळात प्लास्टिकचे प्रदूषण वाढत चालले आहे. त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे नागरिकांनीही ओला आणि सुका कचरा घंटागाडीला देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास निरोगी समाजाची निर्मिती होणार असल्याचे सांगितले.
प्राचार्या चेतना चौगुले यांनी, प्लास्टिक व ई-कचर्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. अभियंते गुडनावर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संदीप हरेल, ज्योती चवई, पूजा वसेदार, निकिता ऐवाळे, रेणुका गवळी, स्वाती पठाडे यांच्यासह शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta