राजू पोवार : धारवाडमध्ये संघटनेची कार्यकारिणी बैठक
निपाणी (वार्ता) : सरकारच्या तकलादू धोरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीतच सापडत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. पण सर्वे मध्ये पक्षपातीपणा केला जात असल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी रयत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. त्यामुळे सर्वांनी संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. गुरुवारी (ता.२१) बेळगाव येथे शेतकरी हुतात्मा दिन कार्यक्रम होणार आहे त्यावेळी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केले आहे. धारवाड येथील एपीएमसी सभागृहात आयोजित कार्यकारिणी निवड बैठकीत ते बोलत होते.
राज्य गौरव अध्यक्ष शशिकांत पडसलगी यांनी स्वागत केले. त्यानंतर संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांनी या पुढील काळात संघटनेच्या बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र नाईक यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेच्या राज्य गौरव अध्यक्षपदी शशिकांत पडसलगी, बेळगाव जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र नाईक, राज्य संचालक पदी गणेश टूडगेर, धारवाड जिल्हा अध्यक्षपदी शिवानंद मायकार, कलघटगी तालुका अध्यक्षपदी शिवनगौडा शिंदोळी, गंगाधर दोडवाड, लिंगाप्पा पुजार, श्रीशैलगौडा यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta