संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे माहे मे महिन्यात बाजार कर फक्त ३८०० रुपये वसूल झाल्याचा मुद्दा नगरसेवक गंगाराम भूसगोळ यांनी उचलून धरला. तब्बल चार महिन्यांनंतर आज पालिकेची मासिक सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. नगरसेवक जितेंद्र मरडी यांनी पालिकेने बाजार करात गोलमाल चालविल्याचे स्पष्ट केले. सभेत बाजार कराचा विषय चांगलाच गाजला.
गंगाराम भूसगोळ म्हणाले, माहे मार्च ते जून अखेरपर्यंत बाजार कराचा हिशोब चुकिचा दाखविला गेला आहे. मार्च महिन्यात बाजार कर १ लाख १७ हजार तर माहे मे महिन्यात फक्त ३८०० रुपये दाखविणेत आला आहे. पालिकेने माहे मे महिन्यात बाजार कर इतका कमी कसा वसूल केला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नगरसेवक जितेंद्र मरडी यांनी पालिकेचे बाजार कर वर्षाकाठी १२ लाख रुपये वसूल होणे शक्य असल्याचे सांगून बाजार कर वसूली चे टेंडर काढण्याविषयी सांगितले. त्यावर एकमत होऊ शकले नाही. मुख्याधिकारी आर. सी. चौगुला यांनी माहे मे महिन्यातील बाजार कराचा खुलासा केला जाईल असे आश्वासन दिले. नगरसेवक संजय शिरकोळी यांनी पालिका उतारा देण्यात राजकारण करीत असल्याचा आरोप केला. त्यावर उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी संबंधित अधिकारीची कानउघडणी केली. नगरसेवकांनी सांगितलेले कामे करण्याविषयी बजावले. नगरसेवक अमर नलवडे म्हणाले, नागरिकांना नळपाणीपट्टी, मालमत्ता कराचे पैसे जमा करण्यासाठी पालिकेच्या चकरा माराव्या लागत आहेत. पालिकेत पैसे जमा करुन घेण्याची सोय नाही. पैसे भरुन घेण्याची व्यवस्था करण्याविषयी सांगितले. सभेत हुक्केरीचे आमदार व राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी गावातील नवीन वसाहत भागात नळपाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन जलवाहिनी आणि दोन जलकुंभ उभारण्यासाठी १७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिल्याचे अभियंता आर. बी. गडाद यांनी सांगितले. नवीव वसाहत भागात नळपाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी कळोळगुत्ती जवळ आणि डॉ. अलेक्झांडर प्लाॅटमध्ये नवीन जलकुंभ उभारणीचे काम केले जाणार आहे. कर्नाटक पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात सर्व्हे करुन जलकुंभ उभारणीचे ठिकाण निश्चित केले आहे. नगरसेवक विनोद नाईक यांनी नमाजमाळ भागात नळपाणी पुरवठा सुरळीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तर नगरसेवक रोहण नेसरी यांनी आपल्या येथे घंटा गाडीचा पत्ता नसल्याचे सांगितले. नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांनी सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्याची मागणी केली. नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी यांनी प्लास्टिक बॅन उत्पादकांकडून करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. नगरसेवक ॲड.प्रमोद होसमनी, चिदानंद कर्देण्णावर, सचिन भोपळे, नंदू मुंडेंनी यांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या. सभापती सुनिल पर्वतराव म्हणाले नूतन मुख्याधिकारी आर. सी. चौगुला चांगले अधिकारी आहेत. गावातील विकास कामे करण्यासाठी सर्व सदस्यांनी त्यांना साथ द्यावी, असे सांगितले. सर्व २३ प्रभागात ओला-सुका कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी बकेट वितरणाचे कार्य सोमवार पासून पालिका हाती घेणार आहे.
घरांचे हक्कपत्र गायब…
संकेश्वरात आवास, आश्रय तसेच अन्य योजनेतून बेघर लोकांना घरांचे वाटप करण्यात आले आहे. पण त्यांना हक्कपत्र दिले गेलेले नसल्याचे जितेंद्र मरडी यांनी सांगितले. पालिकेत यांची साधी नोंद नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. गंगाराम भूसगोळ यांनी पालिकेचे रजिस्टर हरविल्याचे स्पष्ट केले.
नगरसेविका चूप का ?
पालिका सभेत नगरसेविकांनी चुप्पी साधलेली दिसली. प्रभागातील समस्यांचे देणे -घेणे त्यांना नाही काय? सभेत कांहीच न बोलण्याचा अर्थ तरी काय? असे प्रश्न प्रभागातील नागरिकांनी नगरसेविकांना विचारले तर उत्तर काय देणार..? सभेला नगरसेविका मनोरमा सुगते, सुचिता परीट, श्रीविद्या बांबरे, शेवंता कब्बूरी, महादेवी संसुध्दी, रिजवाना रामपूरे, संगिता कोळी, नगरसेवक विवेक क्वळी, हारुण मुल्ला, सभेला उपस्थित होते.