संकेश्वर (महंमद मोमीन) : तवंदी घाट माथ्यावर छोटे-मोठे अपघात ही नित्याचीच गोष्ट बनलेली दिसत आहे.पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरवेगात धावणारी वाहने अपघातग्रस्त होत आहेत. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तवंदी घाटात भरवेगात धावणाऱ्या वाहनांची गती कमी करुन अपघात टाळणे शक्य असल्याचे युवानेते विनोद संसुध्दी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, तवंदी घाट ॲक्सीडेंट स्पाॅट बनले आहे. येथे छोटे मोठे अपघात आता नित्याचेच बनले आहेत. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवून अपघात रोखणे शक्य आहे. रस्ते आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तवंदी घाटात होणारे अपघात रोखण्यासाठी स्पीड लिमिटचा फंडा वापरायला हवा आहे. घाटात वाहनांचे स्पीड लिमिट ३० कि.मी. प्रति तास बंधनकारक केल्यास संभाव्य अपघात टाळणे निश्चितच शक्य होणार आहे. घाटात स्पीड लिमिटचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्यास वाहन चालक घाटात वाहने सावकाश चालवून दंड होणार नाही याची दक्षता घेतील. संबंधित अधिकारींनी स्पीड लिमिट बरोबर आणखी कांहीं कठोर नियम करता येतील ते करुन तवंदी घाटातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे कार्य करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.