नवी दिल्ली : आगामी आशिया कपची तारीख जाहीर करण्यात आली असून हायब्रीड मॉडेल अंतर्गत स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानसह श्रीलंकाही भूषवणार आहे. पाकमध्ये चार श्रीलंकेत नऊ सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू लवकरच संघात पुनरागमन करतील अशी चर्चा रंगली आहे.
खरेतर, अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि युवा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतींमुळे बराच काळ बाहेर आहेत. हे दोन्ही खेळाडू आशिया कप स्पर्धेतून पुनरागमन करू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी दोन्ही खेळाडू मेहनत घेत आहेत.
बुमराह नऊ महिन्यांपासून बाहेर
पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह सप्टेंबर 2022 पासून संघाबाहेर आहे. यामुळे तो ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकही खेळू शकला नाही. आयपीएलच्या 16व्या हंगामालाही तो मुकला. एप्रिलमध्ये बुमराहच्या पाठीवर न्यूझीलंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली पार पडली. त्यामुळे बुमराहला वेदनामुक्त होण्यास मदत झाली.
पाठीच्या दुखीने अय्यर त्रस्त
श्रेयस अय्यरही पाठीदुखीने त्रस्त होता. पाठीच्या खालच्या भागात फुगलेल्या डिस्कमुळे त्याला वेदना होत होत्या. यामुळे मार्चमध्ये अहमदाबादमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची शेवटची कसोटी त्याला मध्यंतरी सोडावी लागली होती. अखेर त्याच्यावरही मे महिन्यात लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली. सध्या तो आणि बुमराह रिकव्हरीसाठी एनसीएमध्ये आहेत. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपसाठी दोन्ही खेळाडू उपलब्ध असल्याबद्दल एनसीएच्या वैद्यकीय पथक आशावादी आहे. बुमराह आणि श्रेयस फिजिओथेरपी घेत आहेत. यदरम्यान, दोहांनी सराव करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते आहे.
Belgaum Varta Belgaum Varta