आमदार रविकुमार गौडा; आमदाराना शंभर कोटीची ऑफर दिल्याचा दावा
बंगळूर : कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप ‘ऑपरेशन कमळ’ चा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने रविवारी दावा केला की, काँग्रेस आमदारांना १०० कोटी रुपयांची ऑफर देऊन भुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मंड्यातील काँग्रेस आमदार रविकुमार गौडा (रवि गनिगा) यांनी हा आरोप केला. भाजपकडून आमदारांना आमिष दाखवून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कॉंग्रेसचे एकही आमदार त्यांच्या आहारी जाणार नाहीत. राज्यातील कॉंग्रेस सरकार स्थिर आणि मजबूत राहील, असाही विश्वस त्यांनी व्यक्त केला.
‘ऑपरेशन कमळ’ (ऑपरेशन लोटस) च्या माध्यमातून राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा भाजपचा कथित प्रयत्न आहे.
आजही मी ठामपणे सांगतो, की त्यांनी (भाजपने) आता ऑफर ५० कोटींवरून १०० कोटी पर्यंत वाढविली आहे, परवा-परवा कोणीतरी फोन केला होता की शंभर (कोटी) तयार आहेत, ५० आमदार खरेदी करायचे आहेत. भाजपचे नेते आता ५० कोटींवरून १०० कोटींवर गेले आहेत, असे गौडा यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मंड्या येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले, “मला कोणीतरी फोन केला होता, पण मी त्यांना १०० कोटी रुपये त्यांच्याकडेच ठेवण्यास सांगितले, मी ईडीकडे तक्रार करण्याचा विचार केला. भाजप दररोज आमचे सरकार पाडण्याचा डाव आखत आहेत, परंतु आमचे सरकार स्थिर आहे, मुख्यमंत्रीही मजबूत आहेत,असे ते पुढे म्हणाले.
गौडा यांनी आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, केंद्रीय मंत्री शोभा करंदलांजे, प्रल्हाद जोशी आणि एच. डी. कुमारस्वामी (धजद) यांच्यावर राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी “टोळी” म्हणून काम केल्याचा आरोप केला.
१३६ आमदारांसह काँग्रेसचे सरकार खडकासारखे मजबूत आहे, एक लोकप्रिय मुख्यमंत्री आहे, जो गरीब समर्थक आहे आणि त्याला कोणीही हटवू शकत नाही, असेही ते पुढे म्हणाले. “परंतु या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वचन दिले आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या उद्देशाने ते फिरत आहेत.”
भाजपचे “दलाल” दररोज काँग्रेस आमदारांशी संपर्क साधत असल्याचा आरोप करून गौडा म्हणाले, “आमचा एकही आमदार यात पडणार नाही. त्यांना (भाजप) आमदार खरेदी करून सरकार पाडायचे आहे. त्यांना अस्थिर करायचे आहे परंतु कर्नाटकात काँग्रेस मजबूत आहे.”
“आम्ही पुरावे गोळा करत आहोत, आम्ही ते ईडी, सीबीआयला देऊ, आम्हाला त्यांना रोख रकमेसह पकडायचे आहे. ज्या व्यक्तीने मला कॉल केला होता त्याचा ऑडिओ माझ्याकडे आहे, त्याला आता हृदयाची धडधड जाणवत असावी, आम्ही योग्य वेळी ते प्रसिद्ध करू, असे ते पुढे म्हणाले.