
जमखंडी : उसाला महाराष्ट्राप्रमाणे दर मिळावा, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मुधोळ तालुक्यात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला आज गालबोट लागलेे. संतप्त शेतकर्यांनी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना आग लावली
यात तीसहून अधिक ट्रॅक्टर व 100 ट्रॉली, दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. यावेळी तुफान दगडफेक झाल्याने अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुखांसह अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी, मुधोळ तालुक्यातील सैदापूर गावापासून जवळ असलेल्या समीरवाडी येथील गोदावरी बायो रिफायनरी साखर कारखान्याचे मालक चर्चा करण्यासाठी येत नसल्याचा राग शेतकर्यांमध्ये होता. याविरोधात आंदोलन करण्याचे हेतूने शेतकरी रिकामे ट्रॅक्टर घेऊन कारखान्याला घेराव घालण्यासाठी जात होते. सकाळपासून शांत पद्धतीने आंदोलन सुरू होते. पण, सायंकाळी आंदोलन चिघळले आणि रस्त्यावर असलेल्या चार उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना आग लावली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. त्यानंतर कारखान्याच्या आवारात असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना शेतकर्यांनी आग लावली. बघता बघता या आगीमध्ये सुमारे 30 हून अधिक ट्रॅक्टर व 100 ट्रॉली जळून खाक झाल्या आहेत. याठिकाणी असलेल्या अनेक दुचाकीदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. यामुळे संपूर्ण कारखान्याच्या आवारात आगीचे लोट पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तुफान दगडफेक करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta