Tuesday , March 3 2026
Breaking News

कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा वाद स्थानिक पातळीवरच

Spread the love

 

मल्लिकार्जुन खर्गे; हायकमांडने कोणताही गोंधळ निर्माण केलेला नाही

बंगळूर : कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेला संघर्ष तीव्र होत असतानाही, नेतृत्व बदलाबाबत पक्षाच्या हायकमांडने कोणताही गोंधळ निर्माण केलेला नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी स्पष्ट केले. हा प्रश्न पूर्णपणे स्थानिक पातळीवरील असून, स्थानिक नेत्यांनीच तो सोडवावा, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आज गुलबर्गा शहरात पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले, “हायकमांडने कोणताही गोंधळ निर्माण केलेला नाही. हा प्रश्न स्थानिक पातळीवरच आहे.”

नेतृत्व बदलाच्या चर्चांबाबत बोलताना त्यांनी विचारले, “हायकमांडवर आरोप करणे कितपत योग्य आहे?” हायकमांडला दोष देण्याऐवजी स्थानिक नेत्यांनी अंतर्गत मतभेद मिटवावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

काँग्रेस पक्ष एखाद्या एकाच नेत्यामुळे उभा राहिलेला नाही, असे सांगत खर्गे यांनी सूचक शब्दांत इशारा दिला. “कोणीही ‘मीच पक्ष उभा केला, माझ्यामुळेच सत्ता मिळाली’ असे म्हणू नये. काँग्रेस हा कार्यकर्त्यांनी उभा केलेला पक्ष आहे. पक्षामध्ये सर्वांचाच वाटा असतो,” असे ते म्हणाले. कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता त्यांनी वैयक्तिक श्रेय घेण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली.

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक योगदानाचा अभिमान बाळगणे थांबवावे आणि सामूहिक प्रयत्नांना महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून केले.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे पक्षाच्या हायकमांडची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता, “या विषयाची मला कोणतीही माहिती नाही,” असेही खर्गे यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही काँग्रेस नेत्याशी मतभेद नाहीत – शिवकुमार
“माझे कोणत्याही काँग्रेस नेत्याशी मतभेद नाहीत. मी आणि मुख्यमंत्री भावांसारखे एकत्र काम करत नाही का?”, असे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले.

रविवारी सदाशिवनगर येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही भेटला आहात का असे विचारले असता ते म्हणाले, “मुख्यमंत्री त्यांच्या जवळचे आहेत का? ते माझ्याही जवळचे आहेत. ते कोणाच्या जवळचे नाहीत ते सांगा. मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा नाही का? राजण्णा जनता दलात होते. मी काँग्रेसचा आहे. एस.एम. कृष्णा यांच्या कार्यकाळात मी राजण्णा यांना अ‍ॅपेक्स बँकेचे अध्यक्ष बनवले. तुम्हाला हवे असेल तर त्यांना जाऊन विचारा. मुख्यमंत्र्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही.”

२७ डिसेंबरला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
२७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील दिल्लीला जाणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील सत्तावाटपाचा प्रश्न अद्याप चर्चेत असल्याने दिल्ली दौऱ्यादरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सत्तावाटपाबाबत हायकमांडच्या निर्णयाला बांधील असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे.

मी सिद्धरामय्या यांच्या पाठीशीच – के.एन. राजण्णा
दरम्यान, माजी मंत्री के.एन. राजण्णा यांनी पुन्हा एकदा आपण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाठीशीच असल्याचे स्पष्ट केले आहे. “उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी काहीही प्रयत्न केले तरी माझी भूमिका बदलणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
डी.के. शिवकुमार यांच्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले, “ते मला शोधत येऊन भेटले नव्हते. ते पक्षाध्यक्ष आहेत, कोणाशीही चर्चा करू शकतात. पक्ष संघटनेबाबतच चर्चा झाली. त्यापलीकडे कोणताही विषय झाला नाही.”
“मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांड घेईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही आपण पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे वारंवार सांगितले आहे. हायकमांड जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत मी वाट पाहीन,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *