Tuesday , March 3 2026
Breaking News

दीर्घावधी झालो, आता पूर्णावधी मुख्यमंत्रीपदाची आशा; मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Spread the love

 

हायकमांडवर विश्वास व्यक्त

बंगळूर : राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढील पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहू, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
राज्यात सत्तावाटपाचा मुद्दा अद्यापही “बूंदीखालील निखारा”सारखा असतानाच, सिद्धरामय्या यांनी आज म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना, “पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा मला पूर्ण विश्वास आहे. मात्र सर्व काही हायकमांडच्या निर्णयावर अवलंबून आहे,” असे स्पष्ट केले.
“मला हायकमांडवर संपूर्ण विश्वास आहे. पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री राहण्याचा आत्मविश्वासही आहे. मुख्यमंत्री म्हणून असा विश्वास असायलाच हवा,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “काय झाले तरी अंतिम निर्णय हायकमांडचाच असतो. त्यांचा निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल,” असे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून सेवा दिल्याचा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर सिद्धरामय्या यांनी पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री राहण्याबाबत पुन्हा एकदा भूमिका मांडल्याने या वक्तव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
गेल्या महिन्यात काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल, सत्तावाटप, गटबाजी, दिल्ली दौरे आणि आमदारांच्या परस्परविरोधी विधानांमुळे राजकीय वातावरण तापले होते. याच पार्श्वभूमीवर, बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत दोन वेगवेगळ्या प्रसंगी सिद्धरामय्या यांनी, “पाच वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार,” असे जाहीरपणे सांगितले होते.
यानंतर काँग्रेस हायकमांडने या विषयावर कोणीही जाहीर वक्तव्य करू नये, असा स्पष्ट संदेश देत नेतृत्वबदलाच्या चर्चेला काहीसा आळा घातला होता. मात्र एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एकदा “नेतृत्वबदल हा हायकमांडचा विषय नाही, तो स्थानिक नेत्यांनीच निर्माण केला आहे,” असे सांगून चर्चेला पुन्हा खतपाणी घातले. नंतर त्यांनीच, “हायकमांडच हा प्रश्न सोडवेल,” असे म्हणत चेंडू पुन्हा हायकमांडच्या कोर्टात टाकला होता.
या सर्व घडामोडींमध्ये सिद्धरामय्या यांनी, “नेतृत्वबदलाबाबत राहुल गांधी निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयाला मी बांधील आहे,” असे स्पष्ट केले होते. राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर असल्याने हा मुद्दा काही काळ शांत झाला होता. मात्र ते या महिन्याच्या ८ तारखेला परतल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना बोलावून अंतिम निर्णय घेतील, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात होती.
अशा स्थितीत आज पुन्हा सिद्धरामय्या यांनी “मीच पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री राहीन,” असा विश्वास व्यक्त केल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले असून काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

रेकॉर्ड मोडण्यासाठी राजकारण केले नाही
माजी मुख्यमंत्री देवराज अरस यांचा विक्रम मोडण्यासाठी आपण कधीही “दाखल्यांचे राजकारण” केले नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “आज मी देवराज अरस यांचा विक्रम बरोबरीत आणला आहे, हे केवळ जनतेच्या आशीर्वादामुळे शक्य झाले आहे.”
“देवराज अरस यांचा काळ वेगळा होता, आजचा राजकीय काळ वेगळा आहे. अरससारख्या महान नेत्याशी माझी तुलना करू नये,” असेही त्यांनी नमूद केले. अरस १९७२ ते १९८० या काळात मुख्यमंत्री होते, तर आपण दोन कार्यकाळ मुख्यमंत्री राहिलो आहोत, असे त्यांनी सांगितले.
राजकारणातून समाधान मिळाले असून, गरीब, दलित आणि मागासवर्गीयांसाठी काम करणे हेच खरे सुख असल्याचे त्यांनी सांगितले. “मी कधीही अरस यांचा विक्रम मोडेन असे स्वप्न पाहिले नव्हते. जास्तीत जास्त एकदा आमदार होईन, असेच वाटत होते. पण आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री अशी जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली,” असे त्यांनी सांगितले.
अरस यांचा विक्रम बरोबरीत आणल्याबद्दल राज्यभर नाटी (देशी) कोंबडी पुलाव वाटप केल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “मला याची माहिती नाही. मी गावचा माणूस आहे. नाटी कोंबडी, रागी मूद्दे हे गावकऱ्यांचे नेहमीचे अन्न आहे. मुख्यमंत्री असल्याने याला जरा जास्त प्रसिद्धी मिळाली इतकेच.”
दीर्घ काळ मुख्यमंत्री राहिल्याच्या निमित्ताने अर्थसंकल्पात विशेष योजना जाहीर करणार का, या प्रश्नावर त्यांनी, “अर्थसंकल्प येईपर्यंत वाट पाहा,” असे उत्तर दिले.
बळ्ळारी घटनेबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा झाली असून चौकशी सुरू आहे. काही जणांना अटक करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, “विरोधकांचे कामच टीका करणे असते. सर्व बाबींची चौकशी सुरू आहे,” असे ते म्हणाले.

दिल्लीहून बोलावले तर चर्चा करीन
एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
“मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत दिल्लीहून बोलावणे आले, तर मी जाऊन चर्चा करीन,” असे त्यांनी सांगितले.
“काल वेणुगोपाल हे वायनाडहून बंगळुरमार्गे दिल्लीला जात असताना, म्हैसूर विमानतळावर केवळ सौहार्दपूर्ण भेट झाली. कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

शिमोग्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

Spread the love  क्रिकेट सामन्यातील वादातून घटना, सात अल्पवयीन ताब्यात बंगळूर : शिमोगा येथे सुलेबैलू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *