मुख्यमंत्री सिध्दरामय्या; भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती केल्याबद्दल धजदवर टीका केली. त्यांच्यावर कोणतीही विचारधारा नसल्याचा आणि सत्तेसाठी काहीही करण्याचा आरोप केला.
आज हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की धजद ही भाजपची ‘बी-टीम’ असल्याचे विधान या आघाडीने सिद्ध केले आहे. मी धजदला भाजपची बी-टीम म्हणायचो, आता ते सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले.
मी त्यांना बी टीम म्हटले तर धजद माझ्यावर नाराज होईल. त्यांनी स्वतःचे नाव धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) जनता दल ठेवले. पण जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी केल्याची सिद्धरामय्या यांनी टीका केली.
धजदचे वरिष्ठ नेते देवेगौडा म्हणायचे की धजद कोणत्याही पक्षाशी जुळवून घेणार नाही. पण आता जी. टी. देवेगौडा (जेडीएस समन्वय समितीचे प्रमुख आणि आमदार) यांनी पक्षाच्या अस्तित्वासाठी भाजपसोबत युती आवश्यक असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले.
दिल्लीत सुरू असलेल्या जी-२० बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रित न करण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे हे अधिकृतपणे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्याना जी २० बैठकीला आमंत्रित न करणे चुकीचे आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की दुष्काळ घोषित केलेल्या भागांना दिलासा देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणारी याचिका केंद्राकडे सादर करण्यात आली आहे, परंतु अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. दुष्काळ जाहीर झालेल्या भागात पिण्याचे पाणी, पेरणीसाठी मदत यासह अनेक उपाययोजना राज्य सरकार करते. मात्र केंद्र सरकारकडूनही वेळीच मदत यायला हवी, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पंतप्रधान व्हावेत, अशी अपेक्षा त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत यावर प्रतिक्रीया देताना ते म्हणाले, मला राष्ट्रीय राजकारणात रस नाही. लोकशाहीत कोणीही पंतप्रधान होऊ शकतो. मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून थेट पंतप्रधानांपर्यंत गेले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सुरू असलेल्या हिजाब, हलाल, हिंदुत्व, सनातन धर्म प्रकरणावर प्रतिक्रीया देताना, हिजाब हलाल प्रकरणे न्यायालयात असल्याचे ते म्हणाले.
खराब गणवेशाची चौकशी
कर्नाटक हातमाग संस्थेने शिक्षण योजनेंतर्गत मुलांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या गणवेशाची चौकशी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. निकृष्ट कपडे पुरविण्याचाही मोबदला असल्याने याला संबंधितांना जबाबदार धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपास सुरू असून, संबंधितांकडून भरलेली रक्कम वसूल करण्याची कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
शिष्टमंडळास भेटीची वेळ नाही
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, म्हादई, कृष्णा आणि कावेरी सिंचन प्रकल्पासंदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेट देण्यासाठी राज्याने केंद्राला लिहिलेल्या पत्राला अद्याप उत्तर मिळालेले नाही. सिंचन प्रकल्पाबाबत राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात पंतप्रधानाना विनंती पत्र लिहिण्यात आले आहे, मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही, असे ते म्हणाले.
म्हादई आणि मेकेदाटू प्रकल्प राबविण्यास तयार आहे. केंद्राच्या वन व पर्यावरण विभागाची परवानगी घेतलेली नाही. म्हणून, आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधानांना भेटणार आहोत. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही पंतप्रधानांना भेटू, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, की त्यांनी महादयी प्रकल्पाशी संबंधित सर्व अहवाल केंद्राकडे पाठवले आहेत आणि आवश्यक परवानगीची विनंती केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta