संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीवरील जुना गोटूर बंधारा हटविणेचे कार्य झाल्यामुळे हिरण्यकेशी नदीतील पाण्याचा प्रवाह गतीने पुढे सरकताना दिसतो आहे. त्यामुळे महापुराचे संकट जवळजवळ टळलेले दिसत आहे. जुना गोटूर बंधारा हटावसाठी भारतीय किसान संघ गडहिंग्लजने शर्थीचे प्रयत्न केले. याकामी कर्नाटक राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचे बहुमोल सहकार्य लाभले. त्यामुळे संकेश्वर नदी काठच्या तसेच भडगावच्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळालेला दिसत आहे. माहे ऑगस्ट 2019 आणि माहे जुलै 2021 मध्ये हिरण्यकेशी नदीला महापुराचा फटका बसला होता. हिरण्यकेशी नदीतील प्रमुख अडथळा ठरलेला जुना गोटूर बंधारा हटविण्याचे कार्य झालेले असल्याने सध्या बरसत असलेल्या संततधार पावसामुळे हिरण्यकेशीला महापुराचे संकट निर्माण होण्याची शक्यता दूर झालेली दिसत आहे.
माहे मे 2022 या कालावधीत हिरण्यकेशी नदीवरील, कर्नाटक राज्यच्या हद्दीतील जुना गोटूर बंधारा हटविण्यात आल्यामुळे हिरण्यकेशी नदीचे पाणी गतीने वाहण्यास मदत झालेली दिसत आहे.नांगनूर पासून भडगाव पर्यंत हिरण्यकेशीचे पाणी पात्रा बाहेर पडून होणारे नुकसान देखील टळलेले दिसत आहे. नदीचे पाणी वाहून जाण्यामध्ये जुना गोटूर बंधारा निश्चितच अडथळ्याचा ठरला होता. याची खात्री आता झालेली दिसत आहे.
जुना गोटूर बंधारा हटवण्यामध्ये भारतीय किसान संघ गडहिंग्लजच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळेच संकेश्वर नदी काठच्या लोकांना तसेच भडगावच्या ग्रामस्थांना महापुराचे संकट टळलेले दिसत आहे. यामुळे कर्नाटक राज्याचे प्रशासन आणि भारतीय किसान संघाचे विशेष आभार संकेश्वर नदी काठच्या लोकांतून तसेच भडगावमधील ग्रामस्थांतून व्यक्त केले जात आहेत. यातून अजूनही महापुराचे संकट ओढविल्यास त्याला हिरण्यकेशी नदीच्या पात्रातील गाळ हेच कारणीभूत ठरणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून हिरण्यकेशी नदी पात्रातील गाळ उपसले गेलेले नाही. त्यामुळे महापुराचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.