बेळगाव : खानापूर रोड, मच्छे येथील नेहरू नगर परिसरात असलेल्या श्रीनिवास फॅक्टरीच्या शेजारी वास्तव्यास असणाऱ्या बोंगाळे कुटुंबातील बालिकेला हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे जीव गमवावा लागला. मधुरा केशव मोरे (वय १३) या बालिकेचा विजेच्या धक्क्याने सोमवारी मृत्यू झाला आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती अशी की, मूळ येळ्ळूर राजहंसगड येथे राहणारी आणि सध्या वडिलांच्या कामानिमित्त कोल्हापूर येथे स्थायिक असणारी मधुरा हि आपल्या आजोळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आली होती. खेळता खेळता मधुराचा हात हाय वोल्टेज केबलला लागला आणि पाहता क्षणीच ती उडून दुसऱ्या मजल्यावर पडली आणि जळून खाक झाली.
गेल्या २ वर्षांपासून सातत्याने हेस्कॉमकडे याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे आज एका मुलीला जीव गमावण्याची वेळ आली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. सुट्टीत आजोळी आलेल्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.