उपनिरीक्षिका उमादेवी; मॉडर्न मध्ये कारगिल दिन
निपाणी (वार्ता) : भारत देश विविध परंपरा आणि संस्कृतीने नटलेला स्वर्ग आहे. सर्व भारतीय एक असून देशाचे नागरिक आहोत. याचा गर्व असला पाहिजे. प्रत्येकांनी सर्व जाती-धर्म आणि भाषेचा आदर करावा. देशसेवा करायची असेल तर फक्त पोलीस अधिकारी किंवा सैन्य अधिकारी होऊन सीमारेषेवर लढायची गरज नाही. आपल्या समाजात राहून देखील आपली कर्तव्ये पार पाडली तरीही देशसेवाच आहे, असे मत शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी यांनी व्यक्त केले.
बेळगाव मराठा मंडळ संचालित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित कारगिल विजय दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य स्नेहा घाटगे होत्या. प्रमुख पाहुणे निवृत्त सैन्य अधिकारी चारुदत्त पावले उपस्थित होते. एस्कॉर्ट विद्यार्थी अवधूत कागले आणि सक्षम हिरेकुडी यांनी मानवंदना दिली. मान्यवरांच्या हस्ते कारगील युद्धातील जवानांना श्रद्धांजली वाहून अमरज्योत पेटविण्यात आली.
निवृत्त सैन्याधिकारी पावले यांनी भारतीय सैन्य दलाच्या कार्याची माहिती दिली. प्राचार्य घाटगे यांनी, विद्यार्थ्यांनी समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. पुस्तकात झुकलेल्या माना पुढे आयुष्यभर ताठ मानेने जगतात. त्यासाठी पुस्तके वाचनाचे आवाहन केले. समर्थ पाटील, दर्शन मारापुरे, सिमरा जमादार, स्वरा जाधव,पल्लवी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. सई चव्हाण हिने सूत्रसंचालन केले. मानसी कांबळे यांनी आभार मानले.