वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसादरम्यान भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या भूस्खलनात १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत २ लहान मुलांसहित १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे ४.१० वाजता दुसऱ्यांदा भूस्खलनाची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात १०० हून अधिक लोक अडकले. तर भूस्खलनात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
या दुर्घटनेनंतर १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या १६ जणांना वायनाडमधील मेप्पाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणा मदतीसाठी धावल्या आहेत. केरळ सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर अनेक राज्यमंत्री या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
वायनाडच्या ४ गावात भूस्खलन
केरळच्या वायनाडमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ४ गावात भूस्खलन झालं आहे. मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांना भूस्खलनाचा तडाखा बसला आहे. या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. चार गावात मिळून ४०० पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून मदतीचं काम सुरू आहे.