उत्तम पाटील यांची अधिकाऱ्यांशी चर्चा; कर्मचाऱ्यांचा संप मागे
निपाणी (वार्ता) : शहरात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या पाणीपुरवठा तू भागातील ५० कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यांपासून थकीत आहे. याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही वेतन न मिळाल्याने सोमवारी (ता.२९) कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.
परिणामी दिवसभर पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे सहकाररत्न उत्तम पाटील यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांशी चर्चा करून थकलेल्या चार महिन्यांपैकी दोन महिन्यांचे वेतन आठवडाभरात देण्याची ग्वाही देण्यात आली. उर्वरित दोन महिन्यांचे वेतन लवकरच देऊ, असे आश्वासन दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.
सोमवारी संप पुकारून येथील जैन इरिगेशनच्या कार्यालयासमोर बसून राहिले. परिणामी शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. याची माहिती मिळताच उत्तम पाटील यांनी नगरसेवकांसह त्वरित कामगारांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली. आयुक्तपदाचा भार असलेले प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांना निपाणीत बोलावून घेण्यात आले. त्यानुसार प्रांताधिकारी व उत्तम पाटील यांनी कामगारांशी चर्चा केली. शहराला पाणीपुरवठा करताना आणि कामगारांचे प्रश्न सोडवताना जैन इरिगेशन कंपनीकडून झालेल्या दुर्लक्षामुळे या कंपनीच्या अधिकाऱ्यांना उत्तम पाटील यांच्यासह नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले. श शिवाय शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना केली.
वारंवार निर्माण होणारा वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी बेंगळूर येथे केयुआयडीएफसी, नगरविकास खाते, नगरपालिका आणि जैन इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उत्तम पाटील यांनी दिले. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला. यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, दत्तात्रय नाईक, विनायक वडे, दीपक सावंत, संजय पावले, दिलीप पठाडे, सुनील शेलार, जैन इरिगेशनचे अधिकारी लक्ष्मीकांत, पालिकेचे अकाउंट विभागाचे नागेंद्र बहादुरी, पाणीपुरवठा विभागाचे सुपरवायझर प्रवीण कणगले, कर्मचारी निलेश पावले, संजय जाधव, सागर कस्तुरे, विशाल जगताप, नेमिनाथ शिंदे, भूपाल कांबळे, नेमिनाथ माने यांच्यासह नगरसेवक, नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.