बेळगाव : येथील समर्थ अर्बन सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सोसायटीच्या सभासदांच्या पाल्यांचा गौरव करण्याचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी आशीर्वाद मंगल कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली सरनोबत या उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. अभय जोशी हे होते.
समर्थ सोसायटीच्या सभासदांच्या पहिली ते नववी पर्यंतच्या 175 विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देऊन गौरविण्यात आले. तर दहावी ते पदवीपर्यंतच्या सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांना रोख रकमेचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, “आजचा विद्यार्थी गुणसंपन्न आहे. पण तो भरकटलेला आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेत आलेल्या अपयशाबद्दल आत्महत्या करतात. पण ते आत्महत्या का करतात याचे कारण शोधण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयात झालेला अंमली पदार्थाचा सुळसुळाट, मुलांची असलेली रिलेशनशिप, पालकांच्या अतिअपेक्षा आणि आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत संपत चाललेला संवाद या सर्व गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन बलशाली भारत निर्माण होण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करण्याची गरज आहे”. पालकांनी कसे जागृत राहण्याची गरज आहे याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
प्रारंभी पाहुण्यांच्या व संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपाध्यक्ष अभय जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत करीत असताना संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संचालिका सुनंदा आळतेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन गायत्री बागलकोटकर व अश्विनी अमाशी यांनी केले तर संचालक प्रदीपकुमार कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा
दरम्यान सकाळी समर्थ सोसायटीच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे चेअरमन अजय सुनाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.