बेळगाव : पावसामुळे शेजारच्या घराची भिंत आमच्या ये-जा करण्याच्या वाटेत पडल्याने अडथळा निर्माण झाला आहे. हा अडथळा दूर करून जीर्ण इमारतीचा धोकादायक भाग पाडून द्यावा, अशी मागणी गोंधळी गल्लीतील रहिवासी व निवृत्त शिक्षिका शशिकला नेवगी यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे केली आहे.
इमारत १०० वर्षे जुनी असून त्यात चार भागीदार आहेत. त्यापैकी एक भाग मी २२ वर्षांपूर्वी खरेदी केला आहे. तेव्हापासून माझे वास्तव्य या घरात आहे. माझ्या वरच्या भागात मूळ मालकांचे वारसदार राहतात. समोरील भाग व त्यावरील माडीचा भाग वारसदारांच्या नातेवाईकांचा असून ते दोन खरेदीदारांनी घेतले आहेत. त्या दोघांमध्ये न्यायालयीन लढा सुरु असून पडलेले घर त्यांच्याच ताब्यात आहे. वाटेत पडलेला अडथळा दूर न केल्याने मला माझ्या जागेतील शौचालयाकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. माझ्या स्वच्छतागृहासमोरच जीर्ण भिंत उभी असून ती केव्हाही कोसळून माझ्या स्वच्छतागृहाचे नुकसान होऊ शकते. शौचालय व स्वच्छतागृहाकडे जाणे बंद झाले आहे. घराचे मालक ढिगारे हटविण्याकडे दुर्लक्ष करत आहेत, या मागणीचे निवेदन दिले आहे.