बुदिहाळचे वसंत पाटील यांची तहसीलदारांविरोधात तक्रार
निपाणी (वार्ता) : बुदिहाळ येथील शेत जमिनीच्या नाव नोंदणी विषयी खोटे मृत्युपत्र मृत्यू दाखले जोडले गेले आहेत, अशा आशयाची माहिती देत जंगम यांनी तहसीलदारांविरोधात शासनाच्या महसूल विभागासह इतर अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनाला प्रतिउत्तर म्हणून बुदिहाळ येथील सदर जमीन पारंपरिक पद्धतीने करणारे शेतकरी वसंत पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री-कर्नाटक राज्य, जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी आपल्या नावे झालेली जमिनीची नोंद ही न्यायालयाच्या आदेशानुसार रितसर झाली आहे. याविषयी चुकीची माहिती दिली जात असून तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून पाटील यांनी केली आहे.
याविषयी पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, निपाणी तालुक्यातील बुदिहाळ गावातील सर्व्हे क्रमांक ४१ ४० व ४१/अ बाबत, दिनांक १९/१२/२०२२ रोजी दिलेल्या मृत्युपत्रानुसार नाव नोंदणी करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करण्यात आला. त्या अर्जानुसार नोटीस देखील देण्यात आली. महसूल निरीक्षकांनी सदर प्रकरण तहसीलदारांकडे हस्तांतरित केले. यानुसार तहसीलदार न्यायालयाने खटला सुरू केला. याविषयी सदर डायरी मंजूर करण्यासाठी सुमारे २ लाख रुपयांची मागणी केली असता तहसीलदार कारंडे यांना पैसे देण्यास आपण नकार दिला. सदर डायरीचे पैसे न दिल्यामुळे, सदर मृत्युपत्राची नोंद करण्यात आली नाही आणि ती डायरी ०२/०२/२०२३ रोजी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.
सदर डायरी रद्द करण्याचे योग्य कारण माहीत नसल्यामुळे मी ०६/०७/२०२३ रोजी तहसीलदार कार्यालय निपाणी येथे न्यायालयाच्या आदेशानुसार नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज दिला. पुन्हा नोटीस आल्यावर महसूल निरीक्षक निपाणी यांनी डायरी फेटाळून पुन्हा प्रकरण तहसीलदार न्यायालयात वर्ग केले. त्यांचे तहसीलदार निपाणी यांनी प्रकरणाचा तपास केला. योग्य कागदपत्रे तपासली, कायदेशीर कारवाई केली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक १४/०९/२०२३ रोजी दिलेल्या आदेशानुसार आमची नावे डायरीत नोंदवण्यास मंजुरी देण्यात आली. असे असताना फक्त सुडाचे राजकारण करताना मंजुरीचे आदेश देणे चुकीचे असल्याचे सांगून पैसे घेऊन बेकायदेशीर काम केले असा खोटा आरोप केला जात आहे. याविषयी चुकीची माहिती पसरवून ते माझा मानसिक छळ करत असल्याने तहसीलदार कारंडे यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.