अलीगड : येथे विषारी दारु पिल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. देशी दारुची पाच दुकाने सील करण्यात आली आहेत, अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व देशी दारुची दुकाने बंद करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांमध्ये दोन ट्रक चालकांचा समावेश आहे. १० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मृतांच्या नातेवाईकांनी देशी दारु दुकानांच्या बाहेर निदर्शने केली.