येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंबीर नेतृत्व आणि सीमा लढ्यातील झुंजार व्यक्तिमत्व दीपक दळवी साहेब यांच्या निधनामुळे सीमाभागावर शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगात दळवी कुटुंबाला आधार देण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेण्यात आली.
या प्रसंगी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवंगत दीपक दळवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य रावजी महादेव पाटील यांनी सांगितले की, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही बरीच वर्षे एकत्रित कार्य केले, त्याचबरोबर शांताराम कुगजी यांनी बोलताना सांगितले की दीपक दळवी साहेबांचे येळ्ळूरशी जिव्हाळ्याचे व भावनिक नाते होते, सीमाप्रश्नाच्या प्रत्येक लढ्याच्या त्यांच्या हाकेला मान देऊन येळ्ळूरमधून मोठ्या संख्येने आम्ही सहभागी होत होतो. येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष विलास घाडी यांनी बोलताना सांगितले की, “दीपक दळवी यांनी आयुष्यभर मराठी भाषेसाठी आणि सीमा बांधवांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांचे जाणे ही केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र एकीकरण समितीची आणि सीमा लढ्याची कधीही न भरून येणारी हानी आहे. माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले की, सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
येळ्ळूर समितीच्या सदस्यांनी दीपक दळवी साहेब यांच्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला. “समितीचा प्रत्येक कार्यकर्ता दळवी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
या सांत्वनपर भेटीवेळी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष भुजंग बा. पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पुं. पाटील, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, येळ्ळूर विभाग समितीचे उपाध्यक्ष मनोहर पाटील व लक्ष्मण मेलगे, विठ्ठल कुरंगी, मल्लाप्पा काकतीकर, मधु य. पाटील, अभिषेक य. देसुरकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta