बेळगाव : कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना असून शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेऊन कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले.
विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी आज, सोमवारी एकात्मिक कृषी अभियान योजनेअंतर्गत बेळगाव उचगाव येथे 2022-23 या वर्षासाठी कृषी माहिती रथाला चालना दिली. कार्यक्रमाला संबोधित करताना हट्टीहोळी म्हणाले की, हा कृषी माहिती रथ शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल आणि त्यांना कृषी उपक्रमांची सर्वसमावेशक माहिती देईल. या रथात कृषीविषयक सर्वसमावेशक माहिती असलेले तज्ज्ञ असून ते खते, बियाणे, विविध यंत्रसामग्री आणि कीटकनाशकांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती घेऊन त्याचा योग्य वापर करावा, असे ते म्हणाले. यावेळी बेळगाव जिल्ह्याचे सहाय्यक कृषी संचालक आर. बी. नायकर, उचागावचे कृषी अधिकारी सी. एस. नाईक, मल्लेश नायक, भाग्यश्री पाटील, आसिफ तहसीलदार, संजय तळवार, उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते.