बेळगाव : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा उच्चांक गाठत आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. उन्हामुळे सकाळच्या सत्रात व रात्री प्रचाराला वेग आला आहे. वाढत्या उष्माघातामुळे जनता घरात तर नेते गावात अशी काहीशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यापासून उष्णतेचा जोर जसा जसा वाढत चालला आहे तसतसा प्रचाराचा देखील जोर वाढत चाललेला आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदान होणार आहे त्यामुळे प्रचारास विलंब झाला तर मतदानामध्ये घट होण्याची होण्याची भीती उमेदवारांमध्ये आहे.
सर्वच पक्षाचे उमेदवार प्रचारासाठी मतदारसंघाचा कोपरान कोपरा पिंजून काढताना दिसत आहेत. प्रत्येक मतदाराची भेट घेण्यात येत आहे. सत्ताधारी पक्ष आपण किती विकास कामे राबविली आहेत. त्याचा पाढा वाचत आहेत तर विरोधी पक्षाचे उमेदवार आमचे सरकार आल्यानंतर आम्ही किती सक्षमपणे काम करू याची आश्वासने देत आहेत. राष्ट्रीय पक्षांकडून मतदारांना प्रलोभने दाखविण्यात येत आहेत तर कधी सत्तेचा माज दाखवत मतदानावर दडपशाही करण्यात येत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मातृभाषेसाठी झटताना दिसत आहेत. मराठीचा जागर एकमुखी चालू आहे त्यामुळे मतदार सध्या स्तब्ध असून मतदारांची द्विधा मनस्थिती देखील झालेली पाहायला मिळत आहे. एकीकडे तथाकथित विकास तर दुसरीकडे मातृभाषेचे रक्षण अशी काहीशी अवस्था मराठी भाषिकांची झालेली दिसत आहे.
उष्णतेचा पारा जसजसा वाढत आहे तसतसा प्रचाराला वेग आलेला आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत मतदारांना घरोघरी भेटून मतयाचना करण्यात येत आहे. तर संध्याकाळच्या वेळेत पदयात्रा काढण्यावर भर देण्यात येत आहे. कार्यकर्ते व नेते पुन्हा कोणतीही तमा न बाळगता गाव, वाड्या, वस्त्या पिंजून काढत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta