बेळगाव : मनपाचे ठेकेदार तसेच कर्मचारी इतके निर्ढावलेले आहेत कि जनतेच्या आरोग्याशी त्यांचे देणेघेणे अजिबात नाही. जनतेशी निगडीत समस्या सोडविण्याकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. खांबावरील लाईट दुरुस्ती, कूपनलिका दुरुस्ती, गटारी स्वच्छ नाहीत की ड्रेनेज स्वच्छ नाहीत. अनेक ठिकाणी डांबरी रस्त्याच्या खाली ड्रेनेज झाकण गेल्याने जर एखादी समस्या उद्भवली तर सुरक्षित असलेला रस्ता जेसीबीने उखडून टाकायचा आणि दुरुस्ती झाली की उखडलेला रस्ता तसाच. फुटलेली ड्रेनेज टाकी दुरुस्ती किंवा ड्रेनेज लाईन स्वच्छ करणे म्हणजे वरवरचे काम अशीच अवस्था रयत गल्लीत झालेली आहे.
रयत गल्ली, भारतनगर, भंगीबोळातील ड्रेनेज गेल्या महिन्यापासून तुंबलेल्या अवस्थेत असल्याने अनेक घराचे पाणी त्यातून न जाता परत घरात येत आहे. त्यात पाऊस झाला की ड्रेनेजमधून घरात पाणी येऊनये म्हणून पाणी काढून गटारीत टाकावे लागत आहे. या भागातील ठेकेदार सुरेकर यांना तक्रार केल्यावर ते येतात पाहणी करतात आणि पुन्हा न येता उडवाउडवीची उत्तरे देतात. आजपर्यंत 15 दिवस झाले तरीही भंगीबोळातील लाईन पुर्ववत करण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही फक्त आश्वासनं देत आहेत. यांना जनतेच्या आरोग्याशी कांही देणेघेणे नाही असेच दिसतय. सांसर्गिक रोगाचा फैलाव होत चाललाय त्यासाठी जनतेने आरोग्य सांभाळावे म्हणून मनपातर्फे जनजागृती करत असतात. पण ठेकेदार सुरेकर, कर्मचारी मात्र अक्षम्य दुर्लक्ष करतात. तशाच परिस्थितीचा सामना रयत गल्लीतील नागरिकांना करावा लागत आहे. ड्रेनेज तुंबलेने आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा उच्च अधिकाऱ्यांनी सदर बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून संबधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांना समज देऊन येथील ड्रेनेज पुर्ववत करण्याचा सक्त आदेश देऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी येथील जनतेची विनंती आहे.
Belgaum Varta Belgaum Varta