बेळगाव : महाराष्ट्र आणि बेळगाव जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रायबाग तालुक्यातील विविध भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
जमखंडी-मिरज राज्य महामार्गावरील कुडची पूल पाण्याखाली गेला असून, पाण्याच्या पातळीतील चढउताराची माहिती मागविण्यात आली. नंतर त्यांनी हिरेबागेवाडी येथील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कुडची येथे पत्रकारांशी संवाद साधला.
पूरग्रस्त भागात आवश्यक खबरदारीची तयारी आधीच करण्यात आली आहे. पूरग्रस्त गावे ओळखण्यात आली आहेत आणि पूर आल्यास त्यांचे स्थलांतर करण्याची तयारी करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील नद्यांमधून येणाऱ्या पाण्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पाऊस वाढत असल्याने बचाव पथक, केअर सेंटरसह आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात जास्त पावसामुळे आणखी पाणी येऊ शकते आणि यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना घरे बांधण्यासाठी तीन लाख रुपये देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासोबतच केंद्र सरकारच्या मदतीसह इतर योजनांचा लाभही दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पाच लाख रुपये जाहीर झाल्यावर सर्वांना दिलासा देणे शक्य नाही. त्यामुळे मदतीची रक्कम कमी केली तरी सर्वांना दिलासा देण्याचा सरकारचा मानस असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta