



आबासाहेब नारायणराव दळवी एक प्रतिभावंत अष्टपैलू व्यक्तिमत्व! ज्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या कुटुंबीयांसह समाजाला आदर्शवत आहे. पेशाने शिक्षक असणारे आबासाहेब हे एक आदर्श शिक्षक तर आहेतच पण ते एक आदर्श व्यक्ती आहेत. फक्त नोकरी करणे हे त्यांच्या मनाला कधी पटलेच नाही. नोकरीसोबतच समाजाच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नोकरीसोबतच कला, क्रीडा क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे आबासाहेब दळवी यांनी राजकीय क्षेत्रात देखील आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना शिक्षकी पेशातील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे सीमाभागातील “राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त झालेले ते पहिले मराठी शिक्षक ठरले. शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर देखील त्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रात देखील आपला दबदबा कायम राखला आहे. आज दि. ३० जुलै हा त्यांचा ७१ वा जन्मदिवस त्यानिमित्त त्यांच्याबद्दल थोडक्यात…..

आबासाहेब दळवी यांचा जन्म ३० जुलै १९५४ साली झाला. आबासाहेब दळवी यांचे वडील नारायणराव सदाशिवराव दळवी तालुक्याच्या दुर्गम भागात ज्ञानदानाचे कार्य करायचे. बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समितीचे ते त्या काळातील शाळा तपासणी अधिकारी होते. अनेक गावात त्यांनी शाळा काढल्या. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आबासाहेब दळवी यांनी देखील शिक्षकी पेशा स्वीकारला. समाजसेवेचे बाळकडू घेऊन जन्माला आलेले आबासाहेब दळवी त्यांना केवळ नोकरी करणे हे कधी जमलेच नाही. समाजाला दिशा देण्यात आपण कुठे कमी पडलो तर मोठे पातक आपल्या हातून घडेल अशीच काहीशी भावना त्यांच्यात होती. आबासाहेब दळवी यांना शालेय जीवनापासूनच कबड्डीची आणि कुस्तीची आवड होती. शिक्षकी पेशात असताना देखील त्यांनी राज्य पातळीपर्यंत कबड्डीची मैदाने गाजवली. क्रीडा क्षेत्रात शिक्षक संघाच्या कबड्डी संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. केवळ मैदानी खेळातच नाही तर ऐतिहासिक, सामाजिक व पौराणिक नाटकातून समाज प्रबोधन करण्यात देखील त्यांचे योगदान आहे. शिक्षकी पेशा असल्यामुळे त्यांचा समाजाच्या प्रत्येक घटकाशी अगदी जवळचा संबंध आहे. आबासाहेब दळवी हे हाडाचे समाजवादी आहेत. सीमाप्रश्न हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने सरकारी नोकरीत असून देखील मराठी भाषेचा अभिमान बाळगण्यात त्यांनी कधीच कच खाल्ली नाही. त्यावरून त्यांच्या हितशत्रूंनी अनेक वेळा त्यांच्यावर गंडांतर आणण्याचा प्रयत्न देखील केला. मराठी मातीशी नाळ जुळलेले आबासाहेब तितकेच निगरगट्ट आहेत. एखाद्या कसलेल्या खेळाडू प्रमाणे त्यांनी प्रत्येक वेळी आलेल्या संकटांवर मात देत सही सलामत आपली सुटका करून घेतली. अर्थात यामध्ये त्यांची अर्धांगिनी सौ. अरुंधती दळवी यांची भक्कम साथ आहे. आबासाहेब दळवी यांनी जिथे जिथे शिक्षक म्हणून सेवा बजावली त्यांनी त्या गावात त्यांच्या पाऊलखुणा आपल्या कार्यातून उमटवल्या आहेत. प्रामुख्याने त्यांच्या कार्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाची सुरुवात केलेले नागुर्डे हे गाव. आजही या गावात त्यांच्या कार्याला आदर्श मानून पिढ्या घडत आहेत. गावात कोणाचे लग्न, बारसे असो किंवा एखाद्याचे मयत दळवी गुरुजी सगळ्यात पुढे असतात. आजदेखील त्यांच्या या कार्यात खंड पडला नाही. आबासाहेब दळवी यांनी आपल्या शिक्षकी पेशाची सुरुवात नागुर्डे येथून केली. त्यावेळी तिथे चौथी पर्यंतचे वर्ग एकाच खोलीत चालायचे. दळवी गुरुजींच्या प्रयत्नाने आज ही शाळा पूर्ण प्राथमिक मराठी शाळा म्हणून नावारूपास आली व स्वतःच्या सुसज्ज इमारतीत आज ही शाळा चालते. त्याचप्रमाणे इथून जवळच असणाऱ्या कान्सुली येथील हायस्कूल स्थापनेत देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षकी पेशात काम करत असताना त्यांनी अनेक माणसे जोडली. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्थायीभाव त्यामुळे अनेक वेळा त्यांच्यावर संकटे देखील आली. अनेक हितशत्रू निर्माण झाले पण आपल्या मतावर ठाम असणे हा त्यांचा स्वभाव आहे. शिक्षक असून देखील समाजाशी ज्यांची नाळ जुळत नाही तो केवळ नोकरदार असतो यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे केवळ शिक्षक म्हणून नोकरी करणे त्यांच्या रक्तात नव्हते. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे नेते म्हणून त्यांनी शिक्षकांच्या अनेक समस्या सोडविल्या. प्रसंगी त्यांनी मस्तवाल राजकारण्यांना अंगावर घेऊन शिक्षकी पेशाचे स्वातंत्र्य व स्वायत्तता जपली. प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था असो किंवा शिक्षक संघटना सेवेत असेपर्यंत आबासाहेब दळवी यांचे वर्चस्व या संघटनांवर निर्विवाद होते. निवृत्तीनंतर देखील मार्गदर्शनासाठी शिक्षक लोकांना आबासाहेबांची गरज भासते ही त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणावी लागेल.
नोकरी सोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांचे कुटुंबीयांकडे कधीच दुर्लक्ष झाले नाही. त्यांच्या पत्नी सौभाग्यवती अरुंधती दळवी या देखील शिक्षकी पेशात ज्ञानार्जनाचे कार्य करत होत्या. त्यांनी आपल्या शिक्षकी पैशाची सुरुवात देगाव या दुर्गम गावापासून केली. ज्ञानदानाचे कार्य करत आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. शिक्षकांच्या पतसंस्थेत देखील त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पतसंस्थेच्या अध्यक्षा म्हणून देखील त्यांनी यशस्वीरित्या कार्यभार सांभाळला. नोकरीसोबतच समाजकार्य करत असताना या दांपत्याची बरीच ओढाताण झाली. मात्र त्यांनी याचा परिणाम आपल्या कुटुंबीयांवर न होऊ देण्याची कसब आजच्या नव्या पिढीसाठी प्रोत्साहन देणारी आहे. आबासाहेबांना सहा मुली व एक मुलगा असे मोठे कुटुंब. मुलगी ही परक्याचे धन असे मानून त्यांच्याबाबत कंजूषी करणे हे दळवी दांपत्याला कधीच मान्य नव्हते. त्यांनी आपल्या मुलींना उच्चशिक्षित केले. त्यांची मोठी मुलगी सौ. शितल यांनी (बी.ए.) पदवीचे शिक्षण घेतले असून त्या बेळगाव वार्ता या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादिका आहेत. सौ. तेजस्विनी यांनी (एमबीए, पीएमपी) व्यवस्थापन शाखेत पदवी प्राप्त केली असून पुण्याच्या एमर्सन ग्लोबल या मल्टिनॅशनल कंपनीत सिनीयर प्रोग्रॅम मॅनेंजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर अनेक देशांचा दौरा केला आहे. सौ. स्नेहल या एम.ए., एम.एड. असून त्या संजय घोडावत ग्रूपमध्ये शैक्षणिक समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. सौ. मिनल यांनी कला शाखेत पदवी प्राप्त केली असून एस.एम.व्ही.व्ही. एड्युटेकमध्ये त्या सीआरएम मॅनेजर आहेत. सौ. स्मितल यांनी एम.सी.ए.चे शिक्षण घेतले असून त्या कोच बिझनेस सल्यूशेन कंपनीत डाटा इंजिनीयर आहेत. सौ. किशोरी ही एम.एस्सी असून गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पॅथॉलॉजी डिपार्टमेटची क्वालिटी मॅनेजर आहे. त्यांचे चिरंजीव प्रसादसिंह एम.एस्सी, एम.टेक असून एक्सेंचर मल्टीनॅशनल कंपनीत संशोधनाचे काम करतात. त्यांनी संशोधनासाठी परदेश दौरा केला आहे. तर स्नुषा सौ. गायत्रीदेवी, बी.सी.एस, सीडॅक डिप्लोमाचे शिक्षण घेऊन पुणे त येथील विप्रो कंपनीमध्ये वरिष्ठ सहयोगी म्हणून कार्यरत आहेत.
सेवा आणि कार्य
१९७५ साली नागुर्डा मराठी शाळा: उच्च प्राथमिक वर्गांना मंजूरी मिळविली.
हलकर्णी मराठी शाळा: उच्च प्राथमिक वर्गांना मंजूरी मिळविली.
मॉडेल मराठी शाळेचे मॉडेल मुख्याध्यापक
मणतुर्गा या त्यांच्या गावी मुख्याध्यापक
इदलहोंड येथे मुख्याध्यापक आणि सेवा निवृत्त
संघ, संस्थांतील कामगिरी
१९८० ते २००४ पर्यंत अखिल भारतीय शिक्ष संघटनेचे खानापूर तालुकाध्यक्ष
खानापूर तालुका सरकारी नोकर संघाचे राज्य परिषद सदस्य १९९५ ते निवृत्तीपर्यंत
१९९० पासून खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे नेतृत्व
खानापूर तालुका शिक्षक संघ गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, अध्यक्ष
१९८० ते २००४ पर्यंत सरकारी कर्मचारी क्रीडास्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करून प्रत्येक वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
यंग मराठा संघ मणतुर्गे या क्रीडा आणि नाट्यसंघाची स्थापना
मणतुर्गा हायस्कूलच्या स्थापनेत सहभाग (१९९२)
कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य
जायंटस् ग्रूपचे संस्थापक सदस्य
२००४ खानापूर तालुका शिक्षक प्रतिनिधी
२०११ कर्नाटक राज्य अध्यक्ष, इंटरनॅशनल ह्युमन राईटस् जस्टीस फेडरेशन दिल्ली
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे ते सरचिटणीस
खानापूर तालुका मल्टीपर्पज को-ऑप.सोसायटीचे चेअरमन
पुरस्कार आणि मानसन्मान
१९९४-९५ सालचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार
२००९-१० जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार
प्रगती इन्स्टीट्यूट ऑफ कॉमर्सचा उत्तम कब्बडीपट्टू पुरस्कार
२०१० गोवा राज्यस्तरीय शिक्षक भूषण पुरस्कार
२०१० खानापूर तालुका पत्रकार संघाकडून सन्मान
२०११ कोल्हापुरी बाणा शिक्षक भूषण पुरस्कार
२०११ श्रमजिवी समाज गौरव, दपोली
२०११ जनसेवा पुरस्कार, पुणे- जनसेवा कला अभियान महाराष्ट्र राज्य
२०११ राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, दृष्टी फाउंडेशन पणवेल-रायगड
२०११ डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार
२०११ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार-जळगाव
२०११ श्रमशक्ती एकता सेवा समिती इचलकरंजीचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार
२०११ वैभव महाराष्ट्राचा गुणगौरव पुरस्कार, कोंढवा- पुणे
२०११ छावा युवा पुरस्कार, पुणे
२०११ समता साहित्य अकादमीचा (मुंबई) राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार
२०११ भीमरत्न पुरस्कार, भीमराय कला अकादमी, परेल-मुंबई
२०११ महाराष्ट्र भुषण पुरस्कार, ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया, मुंबई
२०११ राज्यस्तरीय संकेत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, संकेत क्रीडा प्रतिष्ठाण, पुणे
२०११ राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रगती महिला सामाजिक विकास संस्था, नाशिक
२०११ मानवता पुरस्कार, सत्यम्-शिवम्-सुंदरम् ग्रूप, पुणे
२०११ कोकण गौरव पुरस्कार, हुतात्मा अपंग बहूउद्देशिय विकास संस्था, कराड
२०११ आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मृती, औरंगाबाद
२०११ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकमित्र पुरस्कार बुध्दस्थान धुळे
२०११ इंडियन प्राईड एज्यूकेशन पुरस्कार, अर्जून चॅरिटेबल फाऊंडेशन कोरेगाव-सातारा
२०११ जनकल्याण गौरव पुरस्कार, जनकल्याण सामाजिक संस्था, कोल्हापूर
२०११ श्रीमंत शाहू महाराज परिवर्तक पुरस्कार, पुणे
२०११ विशाल पुरंदर राज्यस्तरीय पुरस्कार, पुरंदर-पुणे
२०११ राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार, कै. रामकृष्ण धोंडीराम काकडे ट्रस्ट, बेडकीहाळ-चिकोडी
२०११ साने गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार, जनसेवा कला-क्रिडा अभियान महाराष्ट्र राज्य
२०१२ राष्ट्रीय तपोभूमी गोवा गौरव पुरस्कार
२०१२ राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, साई प्रतिष्ठान पुणे
२०१२ भारत सरकारच्यावतीने राष्ट्रपती पदक आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर २०१२ रोजी विज्ञान भवन नवी-दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती महामहीम प्रणव मुखर्जी आणि तत्कालीन केंद्रीय मणुष्यबळ मंत्री कपिल सिब्बल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
२०१४ खानापुरातील लोकमान्य भवन येथे ७ सप्टेंबर २०१४ रोजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य एकसष्टी सोहळा साजरा करण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta