Sunday , December 7 2025
Breaking News

महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या समस्या निवारण्यात काँग्रेस सरकार अपयशी : डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या समस्येत अधिक भर पडली असून या समस्या निवारण्यात काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचा विश्वासघात करत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत तर दुसरीकडे शेतकरी अवकाळी पावसामुळे तर कधी मुसळधार पावसामुळे हातबल झाला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकडे देखील सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सध्याचे काँग्रेस सरकार कृती शून्य आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कर्नाटकच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.

महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे ऱ्हास झाला आहे. नुकताच बेळगावात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण कर्नाटकाला हादरवून सोडले आहे. काँग्रेसच्या राज्यात अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांचा प्रतिसाद धक्कादायक असून पिढीला न्याय देण्याऐवजी हे सरकार विरोधकांवर दोषारोप करण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहे. संवेदनशील काँग्रेस सरकारकडे महिलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची इच्छाशक्ती राहिलेली नाही. भाजपा महिला मोर्चा या घटनांचा तीव्र निषेध करते आणि सरकारकडे मागणी करते की, आरोपींवर तात्काळ कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी. राज्यात विशेष पोलीस पथके स्थापन करण्यात यावीत. प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे.

यंदाच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे पिके नष्ट झाली आहेत. ऊस, भात, मका, डाळ, भाजीपाला इत्यादी पिकांची हानी झाली आहे. कर्नाटक सरकार शेतकऱ्यांच्या या समस्येकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असून आजतागायत काँग्रेसने ना कोणती तातडीची मदत, ना पीक हानीचा सर्वेक्षण केला आहे. शेतकरी आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. काहींनी तर आत्महत्येचा मार्ग देखील निवडला आहे. “अन्नभाग्य” आणि “कृषीक्षेम”च्या नावाखाली घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस सरकारने आपली जबाबदारीचा विसर पडला आहे. राज्यातील सर्व पीकहानीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. पीक सर्वेक्षण पारदर्शक पद्धतीने व्हावे आणि शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत थेट त्यांच्या खात्यात जमा व्हावी, अशी कर्नाटक भाजप महिला मोर्चाची मागणी आहे.

About Belgaum Varta

Check Also

जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *