Tuesday , March 3 2026
Breaking News

कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमालेचा जोशपूर्ण सांगता समारंभ उद्या हिंडलगा येथे होणार

Spread the love

 

मण्णूर : शिक्षण हेच परिवर्तनाचे खरे साधन आहे, या उदात्त विचारातून गेले सहा ते सात रविवार सातत्याने राबविण्यात आलेली आणि बेळगाव तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रतिष्ठा मिळवून दिलेली कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमाला उद्या हिंडलगा हायस्कूल, हिंडलगा येथे सांगता समारंभाने पूर्णत्वास जाणार आहे.
या व्याख्यानमालेत विविध विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासातील अडचणी, स्पर्धेचे वास्तव, आत्मविश्वास, ध्येय निश्चिती आणि जीवनातील मूल्ये यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यामुळे ही व्याख्यानमाला केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या मनात आशा, धैर्य आणि उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने रुजवणारी ठरली आहे.
सांगता समारंभाच्या निमित्ताने इंग्रजी विषयाचे अभ्यासक व प्रभावी व्याख्याते श्री. सुनील लाड यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, “परीक्षेला सामोरे जाताना” या विषयावर डॉ. मधुरा गुरव यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी व परीक्षेची भीती दूर करणारे व्याख्यान होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनातील ताण, भीती व संभ्रम दूर करून त्यांना आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याची नवी ऊर्जा देणारे हे व्याख्यान निश्चितच दिशा दाखवणारे ठरणार आहे.
हिंडलगा, मण्णूर, आंबेवाडी, सुळगा, उचगाव, बेकीनकेरी, बेंकनहळ्ळी, बेळगुंदी, चिरमुरी व राकसकोप परिसरातील माध्यमिक विद्यालयांतील दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असून, प्रत्येक विद्यार्थ्याने, तसेच त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन संयोजक श्री आर. एम. चौगुले व मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार मार्गदर्शन पोहोचावे, कोणताही विद्यार्थी आत्मविश्वासाच्या अभावामुळे मागे राहू नये, या प्रामाणिक भावनेतून श्री आर. एम. चौगुले यांनी उभा केलेला हा शैक्षणिक उपक्रम समाजासाठी दीपस्तंभ ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये स्वतःचा आनंद शोधणाऱ्या त्यांच्या या विधायक कार्याबद्दल पालक, शिक्षक व नागरिक वर्गातून मनःपूर्वक कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त होत आहे.
उद्या होणारा हा सांगता समारंभ म्हणजे केवळ कार्यक्रम नसून, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आत्मविश्वास, आशा आणि यशाची नवी पहाट घेऊन येणारा क्षण ठरणार आहे. म्हणूनच सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *