
बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शिवाजी उद्यानात प्राचार्य राजू हळब यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा निरंतर उदंड जयघोष करीत डॉ. टी. एम्. नौकुडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थींनी शिवाजी उद्यानापासून राजहंस गडापर्यंत धावत शिवज्योत नेली. गडाच्या पायथ्यापासून चढत जाऊन सागर बी. एड्.च्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी महाराजांना मानवंदना दिली.
यावेळी बोलताना प्राचार्य राजू हळब म्हणाले, महाराजांचे जीवन हे धैर्य, समानता, स्त्री सन्मान आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे, जे आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. महाराजांची रणनीती, गनिमी कावा आणि गडांचे महत्त्व हे अद्वितीय होते. त्यांनी शत्रू कितीही बलाढ्य असला तरी तो आत्मविश्वासाने हरवता येतो, हे सिद्ध केले. आजच्या तरुणांनी महाराजांचा इतिहास फक्त वाचू नये, तर तो अंगीकारावा. शिवरायांचे शौर्य, बुद्धिमत्ता आणि शिकवण हे युगानुयुगे आपल्याला प्रेरणा देत राहील.
सागर बी. एड् च्या प्रशिक्षणार्थींनीही महाराजांविषयीचे आपले विचार प्रकट केले. स्फूर्तीगीते सादर केली आणि महाराजांच्या जयघोषांनी परिसर दणाणून सोडला. मोहिमेत सागर बी. एड्. चे सर्व प्राध्यापकवर्ग व प्रशिक्षणार्थी सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta