पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देणार
मुंबई / पुणे : संयुक्त महाराष्ट्र चळवळीला गौरवशाली असा इतिहास आहे. परंतु, राज्याच्या सीमेलगत वास्तव्याला असलेल्या मराठी भाषिकांना परभाषिकांकडून देण्यात येणारी वागणूक ही योग्य नसते. म्हणूनच ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी मागणी पुन्हा होऊ लागली आहे. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचण्याचे काम कर्नाटककडून केले जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद संसद अधिवेशनच्या पहिल्या दिवशीच उमटले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र सीमावादासंबंधी राज्य सरकारने तातडीने पावले उचलत योग्य निर्णय घ्यावेत असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी केले. यासंदर्भात ते पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन सादर करणार आहेत.
कर्नाटकसह गुजरात आणि मध्यप्रदेश लगत अनेक मराठी भाषिकांची गावे आहेत. परंतु, राज्य सरकारकडून या गावांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांच्या मनात सरकार विरोधात असंतोष आहेत. त्यामुळे महाराष्ट्रा विरोधात भूमिका घेणाऱ्या अशा गावांमध्ये तात्काळ पायाभूत सुविधा उभारून त्यांच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. सीमालगत असलेल्या गावांमध्ये चांगल्या शाळा, आरोग्य केंद्र उभारणीसह पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापनाची गरज यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये करण्यात आलेली दगडफेक ही अयोग्यच होती. कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर अत्याचार, दडपशाही सुरू आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना रस्तावरील गुंडगिरी, दादागिरी कर्नाटक मधील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना शोभत नाही. कर्नाटकच्या अशा वर्तानामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. जशास तसेच उत्तर देण्यास महाराष्ट्र घाबरणार नाही. परंतु, राज्याचा हिंसेऐवजी विकासावर अधिक विश्वास आहे. अशात सीमावर्ती भागात सरकारने विकास करून या हिंसेचे प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले. सीमावर्ती गावांमध्ये सरकारने तात्काळ विकासकार्य हाती घेतले नाही तर आंदोलनाचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta