मुंबई : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, सत्तास्थापनेचे घोडे कुठेही अडलेले नाही. मी मनमोकळा माणूस आहे. मी कुठेही काहीही धरून ठेवलेले नाही. मी कुठलीही गोष्ट ताणून धरणारा माणूस नाही. मला इतर सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हीच ओळख जास्त प्रिय आहे. मला अडीच वर्षे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी आभारी आहे. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घ्यावा, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा झाली. त्यांना मी सांगितले की, सरकार बनवताना माझा कोणताही अडसर येणार नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. तुम्ही आम्हाला मदत केली, अडीच वर्षे संधी दिली. आता तुम्ही निर्णय घ्या, तो निर्णय मला महायुतीचा प्रमुख म्हणून मान्य असेल. भाजपचे वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील, ज्याला मुख्यमंत्री करतील, त्याला पूर्ण शिवसेनेचे समर्थन आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, निवडणुकीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केले. मी पहाटेपर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोपल्यावर माझी सभा असायची. हे चक्र निवडणुकीभर चालले. मी ८० ते ९० सभा घेतल्या. मी प्रवासही मोठा केला. मी कार्यकर्ता म्हणून काम केले. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केले. नाराज होऊन आम्ही रडणारे नाही. तर जनतेसाठी काम करणारे आहोत. रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करेन. महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाइड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केले, लोकांनी जो विश्वास दाखवला. त्यामुळे हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta