Friday , October 18 2024
Breaking News

कंगना रानौतच्या कारवर शेतकर्‍यांनी केला हल्ला; माफी मागून झाली मार्गस्थ

Spread the love

चंदीगड : वाचाळ अभिनेत्री कंगना रानौतच्या कारवर पंजाबमध्ये शेतकर्‍यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. कंगनाने या हल्ल्याचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ती मनालीहून चंदीगडकडे जात असताना ही घटना घडली. शेतकरी आक्रमक झाल्यानंतर कंगना माफी मागून मार्गस्थ झाली.
श्री किरतपूर साहिबमधील बुंगा साहिब येथे शेतकर्‍यांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या ताफ्याला घेराव घातला. त्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी जमले. त्यामुळे चंदीगड-उना महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कंगनाने शेतकरी आणि महिलांची माफी मागावी, या मागणीवर आंदोलक ठाम होते. अखेर तिने माफी मागून मार्ग मोकळा करून घेतला.
रोपड शहराजवळच्या बुंगा साहिबमध्ये कंगनाची गाडी शेतकर्‍यांनी अडवली. कंगना मनालीहून चंदीगड विमानतळाकडे जात होती. ती विमानाने मुंबईला जाणार होती. मात्र, ताफ्यात कंगना आहे हे कळताच शेतकर्‍यांनी तिची कार अडवली.
शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती. आंदोलनासाठी 100 रुपये देऊन महिलांना आणले जाते, आंदोलन करणारे खलिस्तानी अतिरेकी आहेत, अशी वादग्रस्त विधाने तिने केली होती.
या घटनेबाबत तिने सोशल मीडियावर लिहिले असून त्यात ती म्हणते, ‘मी हिमाचल प्रदेशातून चंदीगडकडे निघाले होते. पंजाबमध्ये येताच मला जमावाने घेरले. ते शेतकरी असल्याचं सांगत आहेत. शिवीगाळ करत आहेत.
जीवे मारण्याची धमकी देत आहेत. देशात अशा प्रकारे मॉब लिंचिंग होत आहे. माझ्यासोबत सुरक्षा रक्षक नसते तर काय स्थिती झाली असती? येथे मोठ्या संख्येत पोलीस आहेत. तरीही जाऊ दिलं जात नाही. मी कोणी राजकीय नेता आहे का? अनेक जण माझ्याविरोधात राजकारण करत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. जमावाने मला घेरले आहे. आणि पोलीस नसते तर माझे आत्तापर्यंत मॉब लिंचिंग झाले असते.’

About Belgaum Varta

Check Also

नोएल टाटा होणार रतन टाटा यांचे उत्तराधिकारी

Spread the loveमुंबई : रतन टाटा यांनी उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवलेल्या टाटा ट्रस्टचा नवा उत्तराधिकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *