नवी दिल्ली : आज राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे. लशींचं महत्त्व आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १६ मार्च हा दिवस लसीकरण दिवस म्हणून पाळला जातो. याचं औचित्य साधून आजपासूनच १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु केल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
१८० कोटीपेक्षा जास्त मात्रा देण्याची कामगिरी करणारी भारताची लसीकरण मोहीम प्रमाण आणि व्याप्तीच्याही दृष्टीनं अभूतपूर्व ठरली आहे, असं ट्विट नायडू यांनी केलं. अनेक प्राणघातक आजार रोखण्यात लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत असतं म्हणून त्याबाबत लोकांमधे विशेषत: ग्रामीण भागात जनजागृतीवर भर देणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. पोलीओ प्रमाणेच कोविड १९ वरही भारत लवकरच मात करु शकेल, असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला आहे.