प्रा. सुभाष जोशी : निपाणीत शोकसभा
निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध चळवळीमध्ये राजाभाऊ शिरगुप्प्पे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याशिवाय त्यांनी निर्माण केलेले साहित्य वाखाण्याजोगे आहे. सर्वत्र भटकंती करत ईशान्य भारत त्यांनीच प्रथम दाखविला आहे. आता कार्यकर्त्यांनी सावध राहून जागृतपणे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे, असे मत माजी आमदार प्रा.सुभाष जोशी यांनी व्यक्त केले. येथील आयएमए हॉलमध्ये रविवारी (ता.५) आयोजित शोकसभेत ते बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. प्रा. प्रमोद कांबळे यांनी शिरगुप्पे यांच्या कार्याचा आढावा घेतला. काँ. धनाजी गुरव यांनी, राजाभाऊ शिरगुप्पे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे असून त्यांचे पुस्तक विद्यापीठात अभ्यासाला लावणे आवश्यक आहे. सांस्कृतिक चळवळीला बदलण्याचे काम त्यांनी केले. नाविन्याचा ध्यास घेऊन ते नेहमी संघर्षामध्ये पुढाकार घेत होते. लिखाणा मधील त्यांची ताकद समाजाला भिडणारी असल्याचे सांगितले.
प्रा. डॉ. अच्युत माने यांनी, विद्रोही साहित्यामधील त्यांचे काम अतुलनीय असून सर्वच चळवळीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.राजाभाऊंचे काम स्मरणात ठेवून त्यांच्या परिवर्तनाची लढाई प्रत्येकाने पुढे नेण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. नानासाहेब जामदार, प्रा. सुभाष जाधव, सुनील कांबळे, कबीर वराळे, प्रा. सुरेश कांबळे, गणी पटेल, प्रा. शरद कांबळे, वकील अविनाश कट्टी, प्रा. एन. आय. खोत, प्रा. जे. डी, कांबळे, प्रा. एन. डी. जत्राटकर यांनी राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी प्रा. संजय कांबळे, प्रा. आनंद संकपाळ, प्रा. डॉ. अशोक डोनर, वकील शिवानंद शिरगुप्पे, बाबासाहेब मगदूम, प्रा. शिवाजी मोरे, सुधाकर माने, प्रा. वाय. टी. संकपाळ, अजय माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.