राजेंद्र वडर -पवार : कोल्हापूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : समाजात चांगले काम करणाऱ्यांची संख्या विरळ आहे. विविध क्षेत्रात आपले काम सांभाळत समाजकारण करणारे लोक कमी आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देण्याचे काम क्रांतीसूर्य फाउंडेशनने केले आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य राजेंद्र वडर – पवार यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात आयोजित राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
गेल्या १० वर्षापासून समाजात शैक्षणिक सामाजिक क्रीडा आरोग्य साहित्यिक आणि पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांचाक्रांतीसूर्य फाउंडेशनकडून गौरव करण्यात येतो. यावेळी देखील महाराष्ट्रासह सीमा भागातील सुमारे २५ गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. बबलू कांबळे यांनी स्वागत केले. क्रांतीसूर्य फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल मोरे म्हणाले, गेल्या दहा वर्षांपूर्वी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करण्मया गुणवंताचा गौरव करण्यासाठी ही एक छोटेसे रोपटे लावण्यात आले होते. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून क्रांतीसुर्य फाउंडेशनकडून प्रत्येक वर्षी समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी ऍड. विवेकानंद पाटील, योगेश दाभाडे, परशुराम कदम आदींसह अनेक आणि मनोगत व्यक्त केले. सीमाभागातील राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार सुनील बर्गे, राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार सचिन परीट, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार उमेश माळगे, राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्रियंका शंकेश्वरे, राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदिका म्हणून माधुरी मिस्त्री व राज्यस्तरीय युवा उद्योजक म्हणून आरिफ शिरगुप्पे यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी आप्पा मोरे, धनंजय ढोबळे, सनी आवटे, नितीन आवटे, अक्षय ढोबळे, श्रीकांत मोरे, बाबासाहेब लोखंडे आदींसह क्रांतीसुर्य फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षदा परीट यांनी सूत्रसंचालन केले. मानसी परीट यांनी आभार मानले.